अहिल्यानगर : राज्य शासनाच्या 'साथी पोर्टल फेज-२' या नव्या प्रणालीविरोधात राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशन यांच्या आवाहनानुसार मंगळवारी (दि. २८) राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळणार आहेत.
या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा खते, बियाणे, कीटकनाशके डिलर्स असोसिएशन यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र या दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
या निर्णयाची माहिती असोसिएशनचे सचिव संग्राम पवार व अध्यक्ष छबुराव हराळ यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साथी पोर्टल फेज-२ प्रणालीमुळे कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या विक्रेत्यांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया, तांत्रिक अडचणी तसेच व्यवहारात अनावश्यक विलंब यांचा सामना करावा लागत आहे.
परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, कीटकनाशके यांसारख्या अत्यावश्यक वस्तू वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांच्या हंगामी शेती नियोजनावर थेट परिणाम होत असून, कृषी उत्पादनावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी वेळेवर पीक नियोजन करतात.
मात्र प्रणालीतील विलंबामुळे खते-बियाण्यांचा पुरवठा उशिरा होत आहे, हे अन्यायकारक आहे, अशी भूमिका डिलर्स संघटनेने घेतली आहे. लागेल, असा इशारा अहिल्यानगर फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस, सीड्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष छबुराव हराळ यांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी सेवा केंद्रधारक व्यापारी या बंदला एकमुखी पाठिंबा देत आहेत. स्थानिक स्तरावर शेतकरी बांधवांनाही या विषयाची जाणीव करून दिली आहे.
असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, साथी पोर्टलचे उद्दिष्ट पारदर्शक व्यवहार असले तरी सध्याच्या प्रणालीत व्यवहारात तांत्रिक गुंतागुंत आणि नेटवर्क समस्येमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे शासनाने कृषी सेवा केंद्रधारक व शेतकरी या दोन्ही घटकांचा विचार करून सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम प्रणाली विकसित करावी.
निवेदनाची प्रत राज्य शासनालाही पाठविण्यात आली आहे. प्रशासनाने शेतकरी बांधव व कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांच्या हितासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
साथी पोर्टलचे व्यवहार
साथी पोर्टलचे उद्दिष्ट पारदर्शक व्यवहार असले तरी सध्याच्या प्रणालीत व्यवहारात तांत्रिक गुंतागुंत आणि नेटवर्क समस्येमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
साथी पोर्टल फेज-२ ही प्रणाली जरी पारदर्शकतेसाठी आणली असली तरी तिच्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकरी वर्गालाही याचा फटका बसत आहे. शासनाने त्वरित सुधारणा कराव्यात, अशी आमची मागणी आहे. - छबूराव हराळ, अध्यक्ष, अहमदनगर फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस, सीड्स डिलर्स असोसिएशन
अधिक वाचा: पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार
