बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना राळा (नाचणी) हे पोषक तृणधान्य शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक ठरत आहे. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरू शकणारे हे पीक शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
कोरडवाहू भागातही स्थिर उत्पादन देण्याची क्षमता असल्याने राळ्याकडे पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात लक्ष वेधले जात आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३ पासून पोषक तृणधान्यांच्या उत्पादन व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण राबविले आहे. त्याअंतर्गत राळा, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांच्या लागवडीवर भर देण्यात येत असून, राळ्याला 'सुपर फूड' म्हणून मान्यता मिळाली आहे.
कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध तसेच रक्तक्षय व मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी राळा उपयुक्त ठरत आहे. राळ्यामध्ये सुमारे ६.६ टक्के प्रथिने, १.३ टक्के स्निग्ध पदार्थ, ७.५ टक्के फायबर, ३.६ टक्के खनिजे तसेच लोह व कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात.
शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
राळा पिकाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असून, कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी असतो. राळ्यापासून भाकरी, सत्त्व, डोसा, लाडू, पापड, बिस्किटे आदी प्रक्रिया पदार्थांना वाढती मागणी आहे. त्यामुळे मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.
शासनाचे उपक्रम
राळा लागवडीसाठी सुधारित बियाणे, कृषी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. पोषण आहार योजना, अंगणवाडी, शालेय आहार व सार्वजनिक वितरण प्रणालीत राळ्याचा समावेश करण्याबाबतही सकारात्मक पावले उचलली जात आहेत. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाणी लागणारी व पोषणमूल्यांनी समृद्ध पिके भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
