नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५१व्या गळीत हंगामात ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, सरासरी रोज साडेसहा मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे.
गाळप हंगाम अजून एक महिना म्हणजे १० फेब्रुवारीपर्यंत चालणार असून सभासद शेतकऱ्यांनी थोडे थांबून आपला ऊस इतर कारखान्यांना न देता नागवडे कारखान्यास देण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले.
नागवडे कारखान्याने यंदाच्या हंगामात उच्चांकी ३१५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३ हजार रुपये अदा केला आहे.
कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांनी सातत्याने सभासद शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली.
त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत सभासद शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले.
