राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे वैधमापन विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली.
राज्यातील साखर कारखान्यामध्ये सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. चालू गळीत हंगामात तर सरासरी एकूण गाळप झालेल्या उसाच्या १० ते १५ टक्के वजनात घट आलेली आहे. यामुळे शेतकरी, वाहतूकदार व ऊस तोडणी मजूर दुहेरी संकटात सापडले आहेत.
यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्याच्या बाहेर राज्य सरकारने संबधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, वजनमापे नियंत्रक यांच्या नियंत्रणात वजनकाटा उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
हा वजनकाटा उभा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, याकरिता आमदार-खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा नियोजन नावीन्यपूर्ण निधी किंवा शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील तर संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या उसातून वजनकाट्याच्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांकडून प्रतिटनाप्रमाणे समान कपात करून घेण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे स्वतंत्र वजनकाटे बसविले जातील व हे वजनकाटे डिजिटल व ऑनलाइन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. कारखान्यांचे वजनकाटे उभारणी करत असताना त्यामधील त्रुटी दूर जाणार आहे.
