सोनई : धार्मिक पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारनेराहुरी ते शनिशिंगणापूर या २१.८४ किमी रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. लवकरच या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.
सोनई, शनिशिंगणापूर परिसरातील सुमारे ४३ हेक्टर ४६९ आर जमिनीचे संपादन होणार असल्याची अधिसूचना (गॅझेट) गुरुवारी (दि. ५) रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाचे मुख्य प्रशासनिक अधिकारी अवनिशकुमार पांडे यांनी प्रसिद्धीस दिली.
त्यावर हरकती दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. ऑक्टोबर-२०२३ मध्ये राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले होते.
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. ५ मार्च रोजी मध्य रेल्वे विभागाने सोनई व शनिशिंगणापूर येथील भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली.
सोनई परिसरातील शेतकऱ्यांची नावे, गटनंबर व संपादन क्षेत्रासह अधिसूचना जाहीर झाल्याने खळबळ उडाली आहे. सोनई व शनिशिंगणापूर परिसरातील ४३ हेक्टर ४६९ आर बागायती जमिनीचे संपादन होणार आहे.
सोनई परिसर हा बागायती भाग असून, या परिसरात उसाचे आगार आहे. त्यामुळे या प्रस्तावित रेल्वेमार्गास शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. शिवाय, सोनई परिसरातील अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून, शेतीशिवाय त्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही.
भूसंपादन करताना सरकारी दराप्रमाणे मोबदला मिळतो, पण सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बागायती क्षेत्रातून हा रेल्वे मार्ग न करता, तो जिरायत भागातून करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे मंत्रालयाने आधी खंडाबा, कात्रड, मोरेचिंचोरा, राऊत वस्ती मार्गे सोनई-शनिशिंगणापूर असा १८ किमी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले होते. या भागात खडकाळ व मुरुमाच्या जमिनी असून, रेल्वेमार्गाचे फाउंडेशन उत्तम होऊ शकते.
जवळच घोडेगाव एमआयडीसी असल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनाही त्याचा उपयोग होईल. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाचे जमिनीवरून व हवाई सर्वेक्षण झाले.
हा रेल्वेमार्ग तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राम्हणी, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी, सोनई, लांडेवाडी रोड, गणेशवाडी रोड, खरवंडी रस्ता, कांगोणी रस्ता मार्गे शनिशिंगणापूर येथे रेल्वे स्थानक होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ३० दिवसांची मुदत हरकतींसाठी दिली आहे.
सरकारने धार्मिक पर्यटन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रपंच देशोधडीला लावू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तीन-चार पिढ्यांचे नुकसान होईल. सोनई परिसरात सर्व बागायती क्षेत्र आहे. पुनर्वसनात सरकार आम्हाला बागायती जमिनी देणार की फक्त तोंडाला पाने पुसणार? खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार का? सर्व बाधित शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध असून, ३० दिवसांत आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवणार आहोत. - अनिल निमसे, बाधित शेतकरी, सोनई
अधिक वाचा: Karj Mafi : पीक कर्ज सोडून शेतीशी निगडीत मुदतीच्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ होणार का?
