यवतमाळ : पारंपरिक कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांमध्ये अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने अनेक शेतकरी पर्यायी आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत. (Maize Cultivation)
अशाच अपेक्षेने बाभूळगाव तालुक्यातील सावर येथील शेतकऱ्यांनी आयुषी ॲग्रोटेक कंपनी (हैदराबाद) यांच्याशी संपर्क साधला. कंपनीने दिलेल्या निर्देशांनुसार शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून १२० एकर क्षेत्रामध्ये मका लागवड केली.(Maize Cultivation)
पण उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यानुसार कंपनीने ७० हजार रुपये प्रति एकर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु हीच नुकसानभरपाई ८४ लाख रुपये स्थानिक कंपनी कर्मचाऱ्यानेच हडप केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Maize Cultivation)
शेतकऱ्यांची मेहनत वाया
संतोष वसंतराव ठाकरे यांच्यासह सावर येथील इतर शेतकऱ्यांनी मिळून १२० एकरमध्ये सीइस मका लागवड केली. कंपनीकडून देखरेख आणि मार्गदर्शनासाठी शिवप्रसाद दत्तात्रय तिखे याची नियुक्ती करण्यात आली.
शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन व हमखास नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.
शिवप्रसाद तिखेला दरमहा ३० हजार रुपये वेतनावर नेमण्यात आले
उत्पादन न झाल्यास ७० हजार रुपये प्रति एकर नुकसानभरपाई मिळेल, असे वारंवार सांगण्यात आले
या खात्रीनिशी शेतकऱ्यांनी सीड्स, औषधे, खत आणि इतर प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी आले.
कंपनीशी संपर्क… आणि शेतकऱ्यांना बसला धक्का
उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीने स्पष्ट सांगितले की,
नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम शिवप्रसाद तिखे याला दिली आहे.
कंपनीकडून पैसे पाठवल्याचे बँक स्टेटमेंटही पुराव्यादाखल देण्यात आले.
यावरून शेतकऱ्यांना समजले की, त्यांची प्रचंड आर्थिक फसवणूक झाली आहे. ८४ लाख रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता कर्मचाऱ्यानेच हडप केल्याचे स्पष्ट झाले.
आर्थिक फसवणुकीची खात्री झाल्यानंतर संतोष ठाकरे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिवप्रसाद दत्तात्रय तिखे (रा. पार्टी तिखे, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्याविरोधात आयपीसी कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मानकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी फरारी असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे.
शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी
या घटनेमुळे सावर येथील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून आगामी पिकांच्या नियोजनावरही मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी आता न्याय आणि नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे आस धरून आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Pest Control : हरभऱ्यावर घाटे अळीचा हल्ला; जाणून घ्या उपाययोजना
