फकीर मोहम्मद बागवान
बदलत्या हवामानात आणि मागील वर्षीच्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी क्षेत्रात पण नियोजनबद्ध लागवड करणाऱ्या टरबूज उत्पादकांनी मोठा आर्थिक दिलासा मिळवला आहे. सध्या शेतातच २३ हजार प्रतिटन असा दर मिळत असून, ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळाली आहे.
पाणीसाठा मुबलक; नियोजनाला मिळाली साथ
यंदा परिसरातील तलाव शंभर टक्के भरल्याने पाण्याची कमतरता भासली नाही. त्यामुळे उस, भाजीपाला, मका, उन्हाळी बाजरी, खरबूज, काकडी, गहू आदी पिकांकडे अनेक शेतकऱ्यांनी वळण घेतले.
मागील हंगामात टरबूजावर व्हायरस व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आणि दर कोसळले होते. त्यामुळे यंदा अनेकांनी रिस्क टाळली आणि याच निर्णयाने बाजारातील मागणी-पुरवठ्याचा समतोल बिघडून दर तेजीत गेले.
कमी लागवड – जास्त दर
यंदा टरबूजाची लागवड तुलनेने कमी प्रमाणात झाली. परिणामी बाजारात दर्जेदार मालाची आवक मर्यादित राहिली.
शेतातच २२–२३ हजार प्रतिटन दर
पुढील काही दिवस दर स्थिर/वाढीची शक्यता
व्यापाऱ्यांच्या मते, बाहेरील भागातून मोठी आवक झाली तर दरात चढ-उतार होऊ शकतो; मात्र सध्या तेजीत कायम आहे.
मागील वर्षी व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं. त्यामुळे यंदा क्षेत्र कमी केलं. निसर्गाने साथ दिली आणि आता २३ हजार टन दराने विक्री होत आहे. खर्च वसूल होऊन चांगला नफा अपेक्षित आहे.- राम आसाराम बिडे, रुई, टरबूज उत्पादक
दर्जेदार मालाची आवक कमी आहे, त्यामुळे दर तेजीत आहेत. पुढील महिनाभर दर स्थिर राहू शकतात.- आक्रम बागवान, टरबूज व्यापारी, अंबड
आर्थिक फायद्याची चिन्हे
मागील तोट्यानंतर यंदा मिळणारा नफा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरत आहे. कमी क्षेत्रात दर्जेदार उत्पादन, योग्य वेळी काढणी आणि थेट शेतात विक्री या तीन गोष्टींमुळे उत्पादन खर्चावर चांगला मार्जिन मिळत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यापारालाही चालना मिळाली आहे.
यशामागची सूत्रे
क्षेत्र कमी, गुणवत्ता जास्त- निवडक लागवड आणि दर्जावर भर
पाणी व्यवस्थापन योग्य- मुबलक साठ्याचा नियोजनबद्ध वापर
बाजाराची अचूक वेळ साधली- मागणी असताना काढणी
जोखीम व्यवस्थापन- मागील वर्षीच्या अनुभवातून शिकलेला धडा
पुढील दिशा
दर सध्या तेजीत असले तरी शेतकरी सावध आहेत. बाहेरील आवक वाढल्यास दरात चढ-उतार होऊ शकतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काढणी, दर्जा राखणे आणि बाजाराशी सातत्याने संपर्क ठेवणे या रणनीतीवर भर दिला जात आहे.
स्मार्ट रिस्क आणि नियोजनबद्ध शेतीमुळे सुखापुरीतील टरबूज उत्पादकांनी तोट्यातून नफ्याकडे यशस्वी झेप घेतली आहे.
