यवतमाळ : सातबारावर नाव नसल्याचे कारण देत शेतकऱ्याची विमा भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने जोरदार दणका दिला आहे. (Vima Yojana)
वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सर्व सदस्य हे कायदेशीर वारस ठरतात, असे स्पष्ट करत आयोगाने शेतकरी बापूराव कोंडबा घुगरे यांना भरपाई देण्याचे आदेश दिले. (Vima Yojana)
काय आहे प्रकरण?
करंजी (ता. उमरखेड) येथील बापूराव घुगरे यांचा मुलगा समाधान घुगरे याचा १ जुलै २०२१ रोजी त्याच्या भावाकडून खून झाला.
शेतकरी कुटुंब असल्याने 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना' अंतर्गत बापूराव यांनी भरपाईसाठी दावा दाखल केला होता.
मात्र, विमा पॉलिसीच्या कालावधीत सातबारावर बापूराव यांचे नाव नसल्याचे कारण देत विमा कंपनीने हा दावा फेटाळला. यानंतर बापूराव घुगरे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली.
आयोगाचे निरीक्षण
आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्य अनिल तोष्णीवाल यांनी सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सर्व सदस्य हे मालमत्तेचे कायदेशीर वारसदार ठरतात
त्यामुळे सातबारावर नाव नसणे हे भरपाई नाकारण्याचे वैध कारण ठरू शकत नाही
'खून'ही अपघातात गणला
विमा कंपनीने 'खून हा अपघात ठरत नाही' असा युक्तिवाद केला.
मात्र आयोगाने स्पष्ट केले की
समाधान झोपेत असताना त्याच्यावर हल्ला झाला
त्याने कोणताही प्रतिकार केला नाही
त्यामुळे ही घटना अपघाती मृत्यूच्या श्रेणीत धरता येईल
असा आहे आदेश
ग्राहक आयोगाने विमा कंपनीला खालीलप्रमाणे भरपाई देण्याचे आदेश दिले.
२ लाख रुपये भरपाई
८% व्याजासह रक्कम
१०,००० रु. मानसिक व शारीरिक त्रासासाठी
५,००० रु. तक्रार खर्च
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश
या निर्णयामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातबारावर नाव नसल्यासही वारसदारांना विमा योजनेचा लाभ मिळू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
यवतमाळ ग्राहक आयोगाचा हा निकाल शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणे देत दावे नाकारण्यापेक्षा वास्तव परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून मिळतो.
अधिक वाचा : Farmer Protest : शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी; 'पॉवर ग्रीड'कडून मिळणार नुकसानभरपाई
