- कपिल केकत
गोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. पण हळूहळू धान उत्पादक शेतकरी कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने भाजीपाला व इतर पिके घेण्याकडे वळत असल्याने जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. गोंदिया व सडक अर्जुनी तालुक्यात दहा धान उत्पादक गावांमध्ये शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.
या दोन्ही तालुक्यातील दहा गावांतील बहुतांश शेतकरी धान या पारंपरिक पिकांवरच अवलंबून होते. शेतीला पूरक असे भाजीपाला उत्पादन मोजकेच शेतकरी घ्यायचे. पण, शेतशिवारात शेततळे, सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती होताच भूजल पातळीमध्ये वाढ झाली. कोरडवाहू शेतीला शाश्वत सिंचन मिळाले.
परिणामतः गावातीत शंभराहून अधिक शेतकरी भाजीपाला पिकासह अन्य दुबार पिके घेत असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी नांदू लागली आहे. पावसाच्या पाण्याशिवाय सिंचनाची दुसरी सुविधा नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य पिकेही घेता येत नव्हती. जलयुक्त शिवार अभियानातील शेततळे, बंधाऱ्यांमुळे भाजीपाल्यासारखे उत्पादन घेण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत बाजारटोला, तेवढा, बिरसाटोला, सिंधीपार, चिवटोला, घाटबोरी या गावांमध्ये हजारो हेक्टरवर भाजीपाला पीक घेत आहे.
अॅपल बोर, पपई, टरबुजाची लागवड
गोंदिया तालुक्यातील बाजारटोला, तेवढा, बिरसीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील सिंधीपार, चिचटोला, घाटबोरीसह अन्य गावातील शिवाराचे भाग्यच पालटले. बहुतांश शेतकरी आता भाजीपाला, हरभरा, अॅपल बोर, पपई, टरबूज या पिकाकडे वळले आहेत. जिल्ह्यातील १६० गावांमध्ये पहिल्या व दुसऱ्या शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले याची शेतकऱ्यांना मदत होत आहे.
गेल्या पाच-दहा वर्षांपासून शेतीत टरबूज, खरबूज, अॅपल बोर, पपई आणि पेरू पीक घेतले जात असून, काही भागात भाजीपालाही लागवड केली जाते. लागवड खर्चाची वजा केल्यास बऱ्यापैकी नफा मिळत आहे. याच आधारावर मी आर्थिक समृद्ध होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
- प्रवीण कापगते, शेतकरी, सिंचीटोला
शेतकऱ्यांनी परंपरागत शेती न करता शेतीला पूरक असे व्यवसाय करावे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भाजीपाल्यासारखे क्लस्टर उभारावे. जलयुक्तसारखे अभियान शेतकऱ्यांसाठी मदतपूर्ण आहेत.
- नीलेश कानवडे, जिल्हा कृषी अधीक्षक
Urea Fertilizer : केंद्र सरकारने युरिया खतासंदर्भात घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी, काय आहे निर्णय
