Unseasonal Rain : उमापूर व परिसरात २८ जानेवारी रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.(Unseasonal Rain)
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले असून, गहू व हरभरा पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.(Unseasonal Rain)
या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. संजय कुटे व जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून महसूल व कृषी विभाग 'अॅक्शन मोड'मध्ये आला आहे.(Unseasonal Rain)
अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर होणार
महसूल विभागाकडून प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांचे क्षेत्रफळ, नुकसानाची टक्केवारी तसेच बागायती पिकांची स्थिती याची नोंद घेतली जात आहे.
पंचनाम्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो तातडीने वरिष्ठ स्तरावर सादर केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
साहेब, आता जगायचे कसे?
महागडी बियाणे, खत-औषधांचे वाढते दर आणि त्यासाठी घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना कापणीच्या तोंडावर आलेले पीक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाले आहे.
खरीपातील नुकसानीची भरपाई रब्बी पिकातून करण्याची आशा या पावसाने मोडून काढली असून, 'आता जगायचे कसे?' असा सवाल पीडित शेतकरी करत आहेत.
तातडीच्या मदतीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत, नुकसानभरपाई तसेच पीकविमा रक्कम देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पंचनामे पूर्ण होताच शासकीय मदत जाहीर व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
संग्रामपूर तालुक्यालाही अवकाळीचा फटका
संग्रामपूर तालुक्यातील दुर्गम भागातील वसाडी, लाडणापुर, शिवणी, आलेवाडी व हडीयमल परिसरात २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे काढणीच्या अवस्थेत असलेली गहू व हरभरा पिके आडवी पडली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती
हरभरा पिकावर फुलोरा असतानाच पावसाचा मारा झाल्याने दाणे भरताना अडथळा निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय काही भागांत फळबागांनाही फटका बसला असून फळगळ झाल्याचे चित्र आहे.
आंदोलनाचा इशारा
पेरणीपासून खत, औषधे व मजुरीवर मोठा खर्च करूनही हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर :Makka kharedi : ऑनलाइन अडथळ्यांमुळे मका उत्पादक वंचित; हमीभाव केवळ घोषणेतच?
