जळगाव : निसर्गाची अवकृपा आणि बाजारभावातील सततचे चढ-उतार यामुळे शेतकरी संकटात सापडला असतानाच, आता 'हळदीच्या पिकाने' शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात हळदीच्या लागवडीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
एकट्या रावेर तालुक्यातील केळीपट्टयात हे क्षेत्र १५०० हेक्टरवरून थेट ३ हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. केळीच्या बाजार भावातील चढ उतार, तसेच इतर कारणांमुळे शेतकऱ्यांचे लक्ष हळदीकडे जात आहे. केळी भावातील घसरणीमुळे शेतकरी यंदा हळदीच्या लागवडीचे वळण्याची शक्यता आहे.
केळी, मक्याने केले निराश
यंदाच्या हंगामात केळी, मका, हरभरा आणि टरबूज या प्रमुख पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. मोठा उत्पादन खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. मात्र, दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षी हळदीने तेजीत राहत उत्पादकांना चांगली साथ दिली आहे.
बाजारपेठेत 'चकाकली' हळद
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हळदीचे भाव प्रतिक्विंटल १९ हजार रुपयांच्या विक्रमी स्तरावर होते. सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि नवीन हंगामातील आवक सुरू झाल्यामुळे भावात काही अंशी घट झाली असली, तरी आजही कोरड्या हळदीला १३ ते १६ हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत आहे. ओल्या हळदीलाही २४०० ते २६०० रुपयांचा दर मिळत असल्याने हे पीक आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक फायदेशीर ठरत आहे.
बॉयलरच्या साहाय्याने हळद उकळणे, पॉलिश करणे आणि पॅकिंग या प्रक्रियेत शेतमजुरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने नऊ महिन्यांच्या 'सेलम' वाणाच्या हळदीला पसंती दिली जात आहे. कापूस आणि सोयाबीनच्या भावातही मोठी सुधारणा नाही. त्यामुळे यंदा शेतकरी चांगल्या प्रतीच्या हळदीच्या मुळांचा (बियाणा) शोध घेताना दिसत आहेत.
यंदा हळदीचे बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी कोरड्या हळदीचे भाव १५ हजारांपर्यंत स्थिरावले आहेत. यावर्षी हळद ही एकमेव पीक शेतकऱ्यांना स्थैर्य देत आहे.
- सुनील कोंडे, हळद उत्पादक, शेतकरी, निंभोरा, ता. रावेर
