अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील तूर पिकाच्या नुकसानभरपाईबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. (Tur Pik Vima)
जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार ३२६ शेतकऱ्यांनी तूर पिकाचा विमा काढला असतानाही केवळ १२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांसाठीच २ कोटी ७६ लाख ९४ हजार ११४ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकरी वंचित राहिल्याने नाराजीचे वातावरण आहे.(Tur Pik Vima)
विमा घेतला हजारोंनी, लाभ मात्र मोजक्यांनाच
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर पिकाचा विमा काढला होता.
एकूण शेतकरी : ५८,३२६
क्षेत्र : १९,१३३ हेक्टर
भरलेला विमा हप्ता : ८३.५७ रुपये लाख
इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग असूनही लाभ फक्त काही मंडळांपुरताच मर्यादित राहिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
किती भरपाई मंजूर?
कृषी विमा कंपनीमार्फत २० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या माहितीनुसार, तूर पिकासाठी एकूण २.७६ कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
ही रक्कम संबंधित १२ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.
'या' मंडळांना लाभ
तूर विम्याचा लाभ खालील महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे.
पातूर तालुका : आलेगाव, बाभुळगाव, चान्नी, पातूर, सस्ती
मूर्तिजापूर तालुका : जामठी, कुरुम
बाळापूर तालुका : बाळापूर, पारस, व्याळा
अकोट तालुका : अकोट, मुंडगाव
तालुकानिहाय विमा घेतलेले शेतकरी
अकोला : ८,०००
अकोट : ३,८४८
बाळापूर : १६,१४०
बार्शीटाकळी : १०,९३३
मूर्तिजापूर : १३,१७३
पातूर : ६,२३२
तेल्हारा : ३,७९५
सोयाबीननंतर तुरीचा दुसरा टप्पा
याआधी १५ एप्रिल रोजी सोयाबीन पिकासाठी विमा भरपाई जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तूर पिकासाठी दुसऱ्या टप्प्यात भरपाई मंजूर झाली आहे. मात्र दोन्ही पिकांमध्ये लाभ मर्यादित क्षेत्रापुरताच राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
विमा हप्ता भरूनही बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पीक नुकसान सर्वत्र झाले असताना केवळ काही महसूल मंडळांनाच लाभ देण्याचा निकष काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांकडून आता उर्वरित मंडळांनाही न्याय देण्याची मागणी होत आहे. प्रशासन आणि विमा कंपन्यांनी याबाबत पारदर्शकता ठेवून स्पष्ट निकष जाहीर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Kapus Pik Vima : कापूस पीक विमा कधी मिळणार? किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
अधिक वाचा : Pik Vima Yojana : शेतकऱ्यांच्या पैशावर विमा कंपन्या मालामाल; ९ वर्षांत कमावले हजारो कोटी
