नवी दिल्ली : आधुनिक बाजारपेठ आणि सोयीसुविधांच्या हव्यासापोटी आज आपली पारंपरिक शेती आणि पोषक आहार मागे पडत चालला आहे. जगभरात फळांच्या ५४०० प्रजातींपैकी केवळ २८ आणि भाज्यांच्या १०९७ प्रजातींपैकी केवळ २० मुख्यत्वे पिकवल्या जात आहेत.
याचाच अर्थ, ६५०० हून अधिक वाण उपलब्ध असताना जग केवळ ४८ प्रकारच्या फळ आणि भाज्यांवर अवलंबून आहे. भारताचा विचार केल्यास आंबा, केळी आणि सफरचंद यांसारखी मोजकीच फळे ७२ टक्के उत्पादन क्षेत्रावर व्यापलेली आहेत.
ही पिके का महत्त्वाची आहेत ?
पारंपरिक पिके केवळ पोषकच नसून ती कमी पाणी आणि कमी मेहनतीत तयार होतात. ही पिके उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहेत. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास ही पिके लहान शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन बनू शकतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे तरी काय ?
राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीने या दुर्लक्षित पिकांना 'भविष्यातील पिके' असे संबोधले आहे. तज्ज्ञांच्या मते, जाड भरड्या धान्याला जसे 'श्रीअन्न' म्हणून ओळख मिळाली, तशी या पिकांना 'अमृत पीक' म्हणून बँडिंग करावे. या पिकांना किमान आधारभूत किंमत व पीकविम्याचे संरक्षण द्यावे. राष्ट्रीय डेटाबेस तयार करावा.
प्रमुख आकडेवारी व वास्तव
जगाची ८० टक्के अर्थव्यवस्था केवळ २० प्रकारच्या पिकांवर टिकून आहे. मानवाच्या ९५ टक्के गरजा केवळ ३० पिकांमधून पूर्ण होतात.
बटाटा (१७ टक्के), टोमॅटो (१४ टक्के), कांदा (९ टक्के), कोबी (७ टक्के), काकडी (६ टक्के) आणि सिमला मिरची (४ टक्के) या ६ भाज्यांनी जगातील ५७ टक्के बाजारपेठेवर कब्जा केला आहे. केळी (२० टक्के), सफरचंद (११ टक्के), द्राक्षे (७ टक्के), संत्रा (१० टक्के) आणि आंबा (६ टक्के) या ५ फळांचा बाजारपेठेतील हिस्सा ५४ टक्के आहे.
पारंपरिक आणि दुर्लक्षित पिकांचे महत्त्व
पारंपरिक फळे : आवळा (व्हिटॅमिन-सी), बेल (औषधी गुणधर्म), जांभूळ (मधुमेहासाठी उपयुक्त), बोर, सीताफळ, करवंद आणि तुती यांसारखी फळे नैसर्गिक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत.
दुर्लक्षित भाज्या : राजगिरा, शेवगा, बसेना, गोवा बिन्स, वालाची शेंग, पडवळ, ढेमसे, गवार व सुरण यांसारख्या भाज्यांचे सेवन कमी होत चालले आहे.
