तुमसर : घाम गाळून पीक उभे केले, पण नशिबाने साथ दिली नाही. बाजारातही भाव मिळत नाही. टोमॅटोचे दर मातीमोल झाल्याने आणि तोडणीचा खर्चही खिशातून भरावा लागत असल्याने, उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या उभ्या टोमॅटोच्या शेतात चक्क गुरे सोडून दिली. ही हृदयद्रावक अवस्था आहे तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सिहोरा) येथील शेतकरी चुन्नीलाल बारबैले यांची !
गत काही दिवसांपासून बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. गुरुवारी व्यापाऱ्यांनी ३० किलोच्या कॅरेटसाठी अवघा १५० रुपये दर दिला, म्हणजेच फक्त ५ रुपये प्रति किलो. चिल्लर बाजारातही हीच स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाहीये.
'शेतकरी वाचवा'च्या फक्त घोषणा देणार काय ?
चुन्नीलाल बारबैले यांनी घेतलेला हा निर्णय प्रशासकीय उदासीनतेवर आसूड ओढणारा आहे. 'शेतकरी वाचवा'च्या घोषणा दिल्या जात असताना, प्रत्यक्षात जेव्हा बळीराजा संकटात असतो, तेव्हा त्याला कोणताही आधार मिळत नाही. टोमॅटोच्या शेतात गुरे चरीत असलेले दृश्य तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या भीषण वास्तवाची जाणीव करून देणारे आहे. आता तरी शासन आणि कृषी विभाग याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
तोडणीचा खर्चही निघेना
शेतकऱ्यांच्या मते, टोमॅटो तोडण्यासाठी मजुरांना द्यावे लागणारे पैसे आणि वाहतुकीचा खर्च मिळून जेवढी रक्कम होते, त्यापेक्षा कमी उत्पन्न विक्रीतून मिळत आहे. त्यातच गत तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला आणि उरलासुरला बाजाराने खाल्ला, अशी भावना येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
टोमॅटो तोडून बाजारात नेणे आता परवडणारे नाही. लागवडीचा खर्च तर सोडाच, पण मजुरीचे पैसेही खिशातून द्यावे लागत आहेत. अशा स्थितीत काय करावे? शेवटी जनावरांना चारा म्हणून हे टोमॅटो खाऊ घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सरकारने आधारभूत किंमत किंवा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
- चुन्नीलाल बारबैले, शेतकरी, तामसवाडी
