नितीन कांबळे
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुंडीतील एका मेहनती शेतकऱ्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केला आहे. (Tomato Damage)
रात्रंदिवस घाम गाळून अडीच एकरात टोमॅटोची यशस्वी लागवड करणाऱ्या कृष्णा दादासाहेब थोरवे यांचं लाखो रुपयांचं पीक अवकाळी पावसामुळे डोळ्यांदेखत वाहून गेलं.(Tomato Damage)
एका बाजूला शेतीसाठी पोटाला चिमटा घेऊन केलेला खर्च, दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष यामधून शेतकऱ्याला आज प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Tomato Damage)
आष्टी तालुक्यातील पुंडी गावातील एक सर्वसामान्य, मेहनती शेतकरी कृष्णा दादासाहेब थोरवे यांच्यावर आसमानी संकट कोसळले आहे. मे महिन्यातच अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या अडीच एकरांवरील टोमॅटो पीक अक्षरशः चिखलात गेले.
टोमॅटो तोडणीच्या अंतिम टप्प्यावर असतानाच आलेल्या या अवकाळी पावसामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांनी कष्टाने उभे केलेले पीक आणि त्यासोबतच त्यांचे अनेक स्वप्नदेखील उद्ध्वस्त झाली आहेत.
पोटाला चिमटा घेऊन केलेली टोमॅटो लागवड
कृष्णा थोरवे हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. पुढील काळात टोमॅटोला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेने त्यांनी अडीच एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली.
एका एकरासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च करत त्यांनी खते, औषधे, फवारणी, बांधणी आणि मजुरी यावर भरपूर पैसा आणि मेहनत घातली. अत्यंत नियोजनपूर्वक आणि कष्टपूर्वक केलेल्या या लागवडीमुळे टोमॅटोचे पीक भरघोस आले होते आणि त्यांचं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर होते.
पावसाने घेतला परीक्षेचा अंत
परंतु नियतीने वेगळाच खेळ खेळला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या टोमॅटो पिकावर थेट घाला घातला. शेतात पाणी साचले आणि पूर्ण पीक चिखलात गेले.
टोमॅटो पिकाची तोडणी सुरू होण्याच्या काहीच दिवस आधी झालेल्या या पावसामुळे संपूर्ण उत्पादन वाया गेले. यामुळे कृष्णा थोरवे यांना अडीच एकर क्षेत्रातील लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि शेतकऱ्याचा रोष
या संकटानंतरही कृषी विभाग किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची दिलासा कार्यवाही किंवा पाहणी अद्याप करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कृष्णा थोरवे यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांमध्येही तीव्र नाराजी आहे.
अपेक्षांचा स्वप्नभंग
रात्रंदिवस मेहनत करून टोमॅटोला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेने अडीच एकरात टोमॅटोची यशस्वी लागवड केली. परंतु अवकाळी पावसाने शेतात पाणी पाणी झाल्याने डोळ्यादेखत टोमॅटोचा अक्षरशः चिखल झाला. त्यामुळे आमच्या सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंग झाला. - कृष्णा दादासाहेब थोरवे, टोमॅटो उत्पादक शेतकरी