नाशिक : कांदा आयात–निर्यात, निर्यातबंदी, नाफेड व एनसीसीएफचा बफर स्टॉक व दर नियंत्रणाचे निर्णय या सर्व गोष्टी आता शेतकरी ठरविणार आहेत. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय कांदा भवन उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना भारत दिघोळे म्हणाले की, “आजपर्यंत कांदा शेती ही बिनभरवशाची व कर्जावर चालणारी शेती होती. परंतु राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेती ही भरवशाची, शाश्वत नफ्याची आणि सुरक्षित शेती बनेल.” राष्ट्रीय कांदा भवन हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून, भविष्यात गरजेनुसार अधिक क्षेत्रात त्याचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणगीतून उभारली जाणार आहे
कांद्याचे निर्णय आता शेतकऱ्यांच्या हेडक्वार्टरमधून
भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही आजपर्यंत कांदा आयात–निर्यात, निर्यातबंदी, नाफेड व एनसीसीएफचा बफर स्टॉक व दरनियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले.
बियाणे संशोधन ते विक्रीपर्यंत संपूर्ण नियंत्रण
राष्ट्रीय कांदा भवन येथून कांदा बियाणे संशोधन व दर्जानियंत्रण, रोपांचे संगोपन, लागवडीनंतरची खते व औषधांचे शास्त्रीय नियोजन, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी, पिकाची संपूर्ण निगराणी अशी सर्व कमी खर्चात व सामूहिक पद्धतीने केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शक करण्यावर भर
राज्यातील व देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीचे व्यवहार हे पूर्णपणे पारदर्शक, कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक, पिळवणूक किंवा लूट होणार नाही. निर्णयप्रक्रियेत शेतकरी सर्वोच्च स्थानी असणार आहे. या तत्त्वांवर राबवण्यासाठी राष्ट्रीय कांदा भवन येथून नियंत्रण ठेवले जाणार आहे.
शेतकरी ग्राहक थेट कांदा विक्री व्यवस्था
सध्या अस्तित्वात असलेली लांब व दलालयुक्त साखळी कमी करून शेतकरी, राष्ट्रीय कांदा भवनमी देशी व परदेशी ग्राहक अशी थेट कांदा विक्री व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत नफा, तर ग्राहकांना माफक व स्थिर दरात कांदा मिळणार आहे.
अद्ययावत सुविधा असलेले आधुनिक केंद्र
राज्यातून, देशातून व परदेशातून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी, पत्रकार, धोरणकर्ते व कांदा क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीराष्ट्रीय कांदा भवन येथे राहण्याची व जेवणाची सुविधा, बैठक व परिषद कक्ष, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप कांदा टेस्टिंग लॅब इत्यादी सुविधा असणार आहे.
यासह सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संवादही, संघर्षही — पण शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य किंवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताविरोधात धोरणे झाली, तर राष्ट्रीय कांदा भवन गप्प बसणार नाही, संवादासोबत गरज पडल्यास संघर्षही केला जाईल, असे दिघोळे यांनी सांगितले.
कांदा शेतीचा नवा अध्याय
राष्ट्रीय कांदा भवन उभारणीमुळे शेतकऱ्यांची कांदा शेती ही कर्जावर चालणारी, अनिश्चित शेती न राहता भरवशाची, शाश्वत नफ्याची आणि भविष्य सुरक्षित करणारी शेती बनेल, असा ठाम विश्वास आहे.
- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
