विठ्ठल भिसे
राज्यातील साखर उद्योगात उसासाठीची स्पर्धा यंदा विक्रमी पातळीवर पोहोचली असून त्याचे सर्वाधिक परिणाम पाथरी तालुक्यात दिसून येत आहेत.(Sugarcane Crushing)
गोदावरी नदीकाठचा बारमाही पाण्याचा पट्टा असल्याने उसासाठी पोषक मानल्या जाणाऱ्या या तालुक्यात यंदा तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे.(Sugarcane Crushing)
चांगली रिकव्हरी आणि दर्जेदार ऊस उत्पादनामुळे पाथरी तालुका बाहेरील साखर कारखान्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
यंदाच्या गळीत हंगामात इतर जिल्ह्यांतील २० हून अधिक साखर कारखान्यांनी थेट पाथरीत धडक देत 'गेट केन' खरेदीला सुरुवात केली.
गेल्या दोन महिन्यांत दररोज सरासरी २५ हजार टनांहून अधिक ऊस बाहेरील जिल्ह्यांत गाळपासाठी रवाना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हार्वेस्टर, ट्रक आणि ट्रॅक्टरचा ताफा घेऊन कारखान्यांनी या भागात अक्षरशः तळ ठोकला होता. काही प्रकरणांत २०० ते २५० किलोमीटर अंतरावर ऊस वाहून नेण्यात आला.
इथेनॉलमुळे उसाची मागणी वाढली
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणानंतर राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी डिस्टिलरी क्षमता वाढवली आहे.
साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीकडे झुकलेला कल लक्षात घेता उसाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक उत्पादन मर्यादित असताना वाढत्या क्षमतेची पूर्तता करण्यासाठी कारखाने बाहेरील भागातून ऊस खेचून आणत आहेत.
यंदा बारामती ॲग्रोसह सहा जिल्ह्यांतील कारखान्यांनी पाथरीतून मोठ्या प्रमाणावर ऊस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक कारखान्यांवर ताण
पाथरी तालुक्यातील दोन खासगी साखर कारखाने एक पाथरी येथे तर दुसरा लिंबा येथे कार्यरत आहेत. मात्र, बाहेरील कारखान्यांच्या स्पर्धेमुळे स्थानिक कारखान्यांना ऊसपुरवठा कमी पडू लागला आहे.
२०२२ मध्ये स्थानिक कारखान्याने मेअखेरपर्यंत हंगाम चालवत ३.२५ लाख मेट्रिक टन गाळप केले होते
यावर्षी मात्र हा आकडा २ लाख टनांवर येऊन ठेपला आहे
सर्वाधिक दर जाहीर करूनही अवघ्या चार महिन्यांत हंगाम आटोपण्याची वेळ स्थानिक कारखान्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांना फायदा; पण पेमेंटचा प्रश्न
दरस्पर्धेमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला आणि ऊस वेळेत गाळपास गेला, हे सकारात्मक ठरले. मात्र, काही बाहेरील कारखान्यांकडून तीन महिन्यांपासून केन पेमेंट थकविल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. काही ठिकाणी हप्त्यांमध्ये रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होत आहे.
संधी की भविष्यातील धोका?
सध्याच्या दरस्पर्धेमुळे शेतकऱ्यांना तात्पुरता लाभ झाला असला तरी तज्ज्ञांच्या मते ही स्थिती दीर्घकालीन दृष्ट्या धोकादायक ठरू शकते.
स्थानिक कारखाने कमकुवत झाल्यास भविष्यात दरनियंत्रण बाहेरील कारखान्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
इथेनॉल-केंद्रित धोरणामुळे उसाची मागणी वाढली असली तरी नियोजनाशिवाय सुरू असलेली 'गेट केन' स्पर्धा स्थानिक साखर उद्योगाच्या समतोलाला धक्का देणारी ठरत आहे.
गोदावरीकाठचा पाथरी तालुका सध्या राज्यातील बदलत्या साखर अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, यंदाचा हंगाम उद्योगातील नव्या दिशेची स्पष्ट झलक दाखवून गेला आहे.
