Sugarcane Crushing : चालू गाळप हंगामात किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याने तब्बल २ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (Sugarcane Crushing)
या कामगिरीमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कारखान्यावरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.(Sugarcane Crushing)
कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रशासकीय व आर्थिक अडचणींवर मात करण्यात यश आले. (Sugarcane Crushing)
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कारखान्याने नव्या जोमाने कामकाज सुरू केले असून यंदाच्या गाळप हंगामात तीन लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण करण्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
१२.५ टक्के साखर उतारा साध्य
चालू हंगामात कारखान्याने सरासरी १२.५ टक्के साखर उतारा साध्य केला आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा योग्य वापर, तांत्रिक नियोजन, अनुभवी कर्मचाऱ्यांचे योगदान आणि शेतकऱ्यांचे सहकार्य यामुळे ही कामगिरी शक्य झाली. ऊसतोडणी, वाहतूक व गाळप प्रक्रिया काटेकोरपणे राबविल्यामुळे गाळप नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यश आले.
शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा
कारखान्याने नियोजनबद्ध पद्धतीने ऊस उत्पादकांना आर्थिक मदत करण्यावर भर दिला आहे. यंदा कारखान्याने २ हजार ७०० रुपये प्रतिटन दराने पहिला हप्ता आधीच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत झाली आहे.
उपपदार्थ निर्मितीवर भर
पुढील काळात साखर उत्पादनासोबतच उपपदार्थ निर्मिती, आर्थिक शिस्त आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यावर कारखाना व्यवस्थापनाचा भर राहणार आहे.
सभासद शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवत कारखान्याची प्रगती अधिक वेगाने साध्य करण्याचा निर्धारही व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
ऊस उत्पादकांमध्ये समाधान
कारखान्याच्या सुरळीत गाळप प्रक्रियेमुळे परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काळात गाळप क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कारखान्याची सातत्यपूर्ण प्रगती स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी ठरत आहे.
