Sugarcane Crop : मराठवाड्यात मार्च व एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे करपलेला ऊस शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण ठरत होता. मात्र, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) करपलेला ऊस पुन्हा हिरवागार झाला आहे. (Sugarcane Crop)
ऊस बहरल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय परिसरात चार साखर कारखाने ऊस खरेदीसाठी सज्ज झाल्याने शेतकऱ्यांना आता गाळपाचीही चिंता राहिलेली नाही. (Sugarcane Crop)
मार्च आणि एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असलेला ऊस पिकाला मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नवी संजीवनी दिली आहे. (Sugarcane Crop)
या पावसामुळे निस्तेज झालेला ऊस पुन्हा हिरवागार आणि बहरलेला दिसू लागला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.(Sugarcane Crop)
अवकाळी पावसाचे वरदान
ऊस उत्पादकांनी यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात घट झाल्यामुळे त्याऐवजी ऊस पिकाची निवड केली.
उन्हाचा तडाखा इतका प्रखर होता की, अनेक भागात ऊसाचे शेंडे करपू लागले होते, जमीन कोरडी पडली होती आणि पीक धोक्यात असल्याचे संकेत मिळत होते.
मात्र, अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) जमिनीत भरपूर ओलावा निर्माण झाला, आणि ऊसाच्या पोंग्यांना नैसर्गिक आधार मिळाल्यामुळे पीक भरभरून फुलू लागले आहे.
या पावसामुळे ऊसाचा उतारा निश्चितच वाढेल,असा विश्वास देवळा येथील ऊस उत्पादक रवींद्र देवरवाडे यांनी व्यक्त केला.
१२ हजार हेक्टरवर ऊस लागवड
अंबाजोगाई तालुका पारंपरिकरित्या ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. मागीलवर्षी समाधानकारक पावसामुळे तालुक्याच्या विविध भागांतील जलस्त्रोत भरून वाहिले.
त्यातच मांजरा धरणातून चार वेळा कालव्यात पाणी सोडण्यात आले, आणि छोट्या जलसाठ्यातही चांगला साठा राहिला.
या अनुकूल स्थितीमुळे यंदा तब्बल १२ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे.
शेतकऱ्यांना गाळपाची चिंता मिटली
ऊस उत्पादन वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गाळपाची चिंता नेहमीच शेतकऱ्यांना भेडसावत असते, मात्र यंदा ही चिंता बऱ्याच अंशी दूर झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात कार्यरत असलेल्या चार प्रमुख साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचा ऊस निश्चित गाळपासाठी जाईल, असा विश्वास निर्माण झाला आहे:
पणगेश्वर साखर कारखाना (पानगाव): अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
अंबासाखर (पुन्हा सुरू): रमेश आडसकर यांनी पुनरुज्जीवित केला आहे.
येडेश्वरी साखर कारखाना: खासदार बजरंग सोनवणे यांचे मालकीचे आहे.
गंगामाउली साखर कारखाना: हनुमंत मोरे यांच्या मालकीचे आहे.
या चारही कारखान्यांमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला जाईल, अशी खात्री शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचे ऊसबाबतचे आर्थिक गणित बळकट झाले आहे.
उसाचा उतारा वाढणार
अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी ऊस पिकासाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. या अवकाळी पावसाचे पाणी उसाच्या पोंग्यात गेल्याने व जमिनीत भरपूर ओलावा झाला असल्याने ऊस उतारा चांगला मिळेल, अशी अपेक्षा देवळ्याचे ऊस उत्पादक शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी सांगितले.