साक्री : गेल्या पाच महिन्यांपासून उसाचे बिल थकल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
२०२५ च्या गळीत हंगामात आपला ऊस एस जे शुगर (रावळगाव) या कारखान्याला गाळपासाठी दिला होता. शासनाच्या नियमानुसार, ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल मिळणे बंधनकारक आहे.
मात्र, पाच महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. या संदर्भात कारखाना प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
संसाराचा गाडा हाकणे झाले कठीण
आंदोलनाचे नेतृत्व करणारे धनंजय अहिरराव यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "कारखान्याने पैसे न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, दवाखाना आणि लग्नसराईच्या खर्चासाठी पैसे नसल्याने कुटुंब विवंचनेत आहे. नाईलाजास्तव आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले असल्याचे यावेळी शेतकऱ्यांची सांगितले.
आता शेतकऱ्यांनी दिली ३० एप्रिलची 'डेडलाईन'
या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर ३० एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित कारखान्याने २९०० रुपये प्रति टन प्रमाणे थकीत बिले अदा केली नाहीत, तर सर्व बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसतील.
