गोंदिया : शासनाकडून आजघडीला सौर ऊर्जेवर अधिकाधिक भर दिला जात असून, यासाठीच नवनवीन योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना सौर ऊर्जा यंत्रणा बसवून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. असे असतानाही कित्येक जणांना आजही महावितरणच्या या सौर ऊर्जा योजना व उपक्रमांबाबत माहिती नसल्याने ते यापासून दूरच आहेत.
अशात जास्तीत जास्त नागरिकांना सौर ऊर्जा वापरावर माहिती व्हावी व त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे लगेच निवारण करता यावे, यासाठी महावितरणकडून विशेष जनजागृती व तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
शासनाकडून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कित्येकांना आजही सौर ऊर्जेचे किती लाभ आहेत, याची माहिती नसून कित्येकांच्या तक्रारी असल्याने ते याकडे धजावत नाहीत. अशात नागरिकांमध्ये सौर ऊर्जा जनजागृती व्हावी, तसेच त्यांच्या तक्रारींचे लगेच निवारण करता यावे, यासाठी महावितरणकडून उपविभाग स्तरावर सौर जनजागृती व तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या तक्रारींचे निवारण करण्यात येणार
शिबिरात पंप कार्यरत नसणे, पूर, माकड किंवा इतर कारणांमुळे सोलार पॅनल-पंपचे नुकसान, सोलार पॅनल किंवा पंप चोरीस जाणे, पाणी उचल प्रणाली कार्यरत नसणे, संपूर्ण रक्कम भरूनही पंपाची स्थापना झालेली नसणे आदी तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांनी शिबिरास उपस्थित राहताना आपला एमटीआयडी व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या प्रकरणांवर त्वरित कार्यवाही करता येईल.
कृषी पंप ग्राहकांचे समाधान गरजेचे
वीजपुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शेतीला योग्यरीत्या सिंचन होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असते. अशात सौर कृषी पंप त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मात्र, त्यात शेतकऱ्यांना काही समस्या आल्यास व त्याचे वेळीच निराकरण न झाल्यास शेतकरी नाराज होतात. अशात शेतकऱ्यांना प्राथमिक देऊन त्यांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करता यावे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौर कृषी पंपाकडे वळतील, हा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे.
