Solar Scheme : राज्यातील शेतकऱ्यांचा कायमचा डोकेदुखी ठरलेला वीज प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Solar Scheme)
महावितरणमार्फत अंमलात आणलेल्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १९ जानेवारीपर्यंत ११ हजार ३४७ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला शाश्वत वीजपुरवठ्याचे बळ मिळाले आहे.(Solar Scheme)
पूर्वी वीजपुरवठा अनियमित आणि विस्कळीत असल्याने शेतकऱ्यांना अनेकदा रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत होते. साप, विंचू तसेच वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत होता. (Solar Scheme)
मात्र, सौर कृषिपंपामुळे आता दिवसा सिंचन शक्य झाले असून रात्रीच्या त्रासातून शेतकरी मुक्त झाले आहेत. विजेच्या लपंडावाची चिंता संपल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल झाला आहे.(Solar Scheme)
रब्बी पिकांना दिलासा
वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे गहू, हरभरा यांसारखी रब्बी पिके धोक्यात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती. अनेक ठिकाणी दिवसा वीज मिळत नाही आणि रात्रीही पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने सिंचनाचे मोठे संकट निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अद्याप अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सौरपंपाचा लाभ द्यावा, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.
योजनेचे ठळक फायदे
* सौर कृषिपंपामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत.
* मोफत वीज : सौरऊर्जेमुळे वीज बिलाचा कोणताही आर्थिक बोजा नाही.
* दिवसा सिंचनाची सोय : सूर्यप्रकाशात पंप पूर्ण क्षमतेने चालत असल्याने पाण्याचे नियोजन सोपे झाले आहे.
* वेळ आणि श्रमांची बचत : रात्री जागून पाणी देण्याची गरज नसल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.
* पर्यावरणपूरक योजना : प्रदूषणमुक्त आणि शाश्वत ऊर्जेला चालना देणारी योजना ठरत आहे.
अर्जांची संख्या मोठी
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सौर कृषिपंपाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यापूर्वी कुसुम योजनेअंतर्गत सौरपंप देण्यात येत होते. मात्र, ती योजना बंद झाल्यानंतर आता 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेंतर्गत लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यात २२ हजार ५०२ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून, २० हजार २२० शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली आहे. यापैकी ११ हजार ३४७ शेतकऱ्यांच्या शेतात पंप कार्यान्वित झाले आहेत.
६० दिवसांत पंप बसविणे बंधनकारक
या योजनेंतर्गत शेतकऱ्याने आपला हिस्सा भरल्यानंतर ६० दिवसांत सौर कृषिपंप बसविणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
शासनाकडून पंपासाठी अनुदान दिले जाते, तर शेतकऱ्यांनी भरलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते आणि उर्वरित रक्कम कंपनीला शासनाकडून दिली जाते.
सौर कृषिपंप योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वीज प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटत असून, शेती अधिक सुरक्षित, सुलभ आणि शाश्वत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
