भंडारा : मोहाडी तालुक्यात मागील आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये बसविण्यात आलेली सोलर पॅनल यंत्रणा अक्षरशः कोलमडली. लाखो रुपयांची गुंतवणूक एका क्षणात उद्ध्वस्त झाली आहे. नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता सोलर कंपन्यांच्या बेफिकिरीचा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
खैरलांजी येथील शेतकरी पुरुषोत्तम बिसन तितीरमारे यांच्या शेतातील सोलर पॅनल पूर्णतः नष्ट झाले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित कंपनी दुरुस्तीसाठी येत नसल्याने ते हतबल झाले आहेत. पाण्याचा दुसरा पर्याय नसल्याने रब्बी पिके वाचवावी तरी कशी? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
राहुल हिंमतराव पुडके (रा. धुसाळा) या शेतकऱ्यांचे सोलर पॅनल पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे याच प्रकारे नुकसान झाले असून, कंपन्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. सोलर बसविताना आकर्षक आश्वासने देणाऱ्या कंपन्या संकटाच्या वेळी मात्र गायब होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. वीज नाही, सोलर बंद मग शेती कशी करायची? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. सोलर कंपन्यांची चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करून दोषर्षीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तक्रार कुठे कराल?
वादळ किंवा पावसामुळे सोलर पॅनेलचे नुकसान झाल्यास, महावितरणच्या 1912 टोल-फ्री नंबरवर किंवा महावितरण पोर्टल वर तक्रार करा. नुकसानीचे फोटो, पंप नंबर आणि युनिट नंबरसह अर्ज जवळच्या महावितरण कार्यालयात जमा करा. कुसुम योजनेअंतर्गत ५ वर्षांची मोफत दुरुस्ती असते, त्यामुळे त्वरित तक्रार करून भरपाई मिळवा.
