- सुनील चरपे
नागपूर : मानवी आराेग्यविषयक समस्यांमुळे सेंद्रिय शेतमालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्पादन कमी हाेत असल्याने तसेच समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेण्यास उत्सुक नसतात. पिके त्यांना आवश्यक आलेली अन्नद्रव्ये मातीतून मुळांवाटे शाेषून घेतात. मातीत मिसळलेली अन्नद्रव्ये सेंद्रिय आहेत की रासायनिक याची ओळख पिकांना करता येत नाही.
मातीतील आम्लता किंवा क्षारता माेजण्याला ‘पीएच’ संबाेधले जाते. ७.० हा तटस्थ किंवा नैसर्गिक पीएच मानला जात असला तरी पिकांच्या उत्तम उत्पादनासाठी ६.० ते ७.५ दरम्यानचा ‘पीएच’ आदर्श मानला जाताे. कारण या रेंजमध्ये बहुतेक पोषक तत्वे पिकांना सहज उपलब्ध होतात व त्यांची चांगली वाढ होते.
पीएच व त्याचे कमी-अधिक प्रमाण
१) पीएच ५.५ पेक्षा कमी असले तर ती माती जास्त आम्लधर्मी होते. ज्यामुळे फॉस्फरस हा लोह व ॲल्युमिनियमच्या बंधनात अडकल्याने पिकांना मिळत नाही. ॲल्युमिनियम, मॅंगनीज घातक ठरतात.
२) पीएच ८.० पेक्षा जास्त असेल तर ती माती जास्त अल्कधर्मी होते. ज्यामुळे पिकांना झिंक, लाेह, बोरोन, मॅंगनीज हे अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते.
३) बिघडलेल्या पीएचमुळे माती जिवंत ठेवणारे जिवाणू मृतवत हाेतात व बुरशी वाढते तसेच नायट्राेजनचे स्थिरीकरण मंदावते.
पीएचचा असमताेल व त्याचे दुष्परिणाम
१) जमिनीत क्षारांचे प्रमाण अधिक असणे, सिंचनाच्या पाण्याचा अतिवापर करणे किंवा पाण्याची कमतरता भासणे, परस्पर विराेधी खते एकत्र मिसळून देणे, खतांचा अतिवापर, सेंद्रिय पदार्थांची कमतरता, परस्पर विराेधी अन्नद्रव्ये यामुळे पीएचचा असमताेल निर्माण हाेताे.
२) क्षारांचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा याेग्य निचरा हाेत नाही, ऑस्मोटिक दाब वाढतो व झाडांना पाणी व अन्नद्रव्ये शोषणे कठीण जाते.
३) पीएच खूप आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असल्यास पिकांच्या मुळांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे मुख्य अन्नद्रव्ये मिळत नाही.
४) चिकट किंवा जड जमीन असल्यास हवा खेळती राहत नसल्याने पाणी व अन्नद्रव्यांची हालचाल मंदावते. सेंद्रिय पदार्थांच्या कमतरतेमुळे जमिनीची धारणशक्ती व अन्नद्रव्ये संतुलन बिघडते.
खत व पाणी व्यवस्थापनातील चुका
१) अतिपाणी दिल्यास खते मुळांच्या भागातून वाहून जातात किंवा मुळकुज होते. खत दिल्यानंतर पाणी न दिल्यास नायट्रोजन उडून जाते.
२) मुळांभोवती क्षार साचल्यास पिकांच्या मुळांना इजा होते. खतांच्या अतिवापरामुळे क्षारदाह होतो.
३) युरिया व अमोनियम नायट्रेटसारखी विसंगत खते एकत्र मिसळल्यास विद्राव्यता कमी हाेत असल्याने त्यांचे शोषण होत नाही.
अन्नद्रव्यांचा परस्परविरोध
१) जास्त फॉस्फरस - झिंक व काॅपरचे कमी शोषण.
२) जास्त नायट्रोजन - काॅपर व पोटॅशियमचे कमी शोषण.
३) जास्त पोटॅशियम - मॅग्नेशियम व बोरॉनचे कमी शोषण.
उपाय
१) आम्लधर्मी मातीला चुना, डोलोमाइट, बायोचार व राख तसेच अल्कधर्मी जमिनीला जिप्सम, सल्फर, सेंद्रिय पदार्थांची जोड आवश्यक असते. हे उपाय तो माती परीक्षणानंतर करणे गरजेचे आहे. चांगल्या उत्पादनासाठी पाणी तसेच नांगरणीच्या आधी मातीची चाचणी व प्रत्येक खत वापराआधी मातीचा स्वभाव ओळख विचारात घेऊन उपाययाेजना करणे गरजेचे असते.
२) खते देताना समतोल पाणी व्यवस्थापन ठेवणे. पिकांची गरज व हंगामानुसार संतुलित खतांचा वापर करणे. नायट्रोजन दिल्यानंतर तात्काळ पाणी देणे. सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची रचना व हवा खेळती ठेवणे. अन्नद्रव्य संतुलन राखणे.
