अमरावती :शेतीत अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. (Soil Health Card)
याच उद्देशाने कृषी विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृद तपासणी मोहीम राबविण्यात आली असून यंदा तब्बल १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 'सॉइल हेल्थ कार्ड' वितरित करण्यात आले आहे.(Soil Health Card)
या कार्डमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती समजून घेऊन योग्य खत व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.(Soil Health Card)
कृषीतज्ज्ञांच्या मते, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वाढता खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण हा प्रभावी उपाय ठरतो. (Soil Health Card)
जमिनीतील कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत, कोणत्या प्रमाणात खते द्यावीत आणि कोणते पीक घ्यावे याबाबत मृद आरोग्य पत्रिकेमुळे अचूक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यास मदत होते.(Soil Health Card)
जिल्ह्यात ४१ हजारांवर नमुने
कृषी विभागाने जिल्ह्यात ४२ हजार माती नमुन्यांचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ४१ हजार २७४ नमुने शेतकऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत.
शासकीय तसेच अशासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून या नमुन्यांची तपासणी सुरू असून जिल्ह्यातील एकूण तपासणीचे प्रमाण ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
या प्रक्रियेतून आतापर्यंत १३ हजार ६० मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.
माती नमुना घेताना घ्यायची काळजी
* कृषी विभागाने मातीचा नमुना घेताना काही बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
* नमुना घेताना तो झाडाखालील, बांधावरील किंवा जनावरे बसतात त्या ठिकाणचा नसावा.
* शेतात इंग्रजी 'V' आकाराचा खड्डा करून त्याच्या बाजूची माती गोळा करावी.
* घेतलेला नमुना सावलीत वाळवूनच प्रयोगशाळेत पाठवावा, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सतत एकाच प्रकारची पीक पद्धती अवलंबल्यामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारख्या प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू (PH), क्षारता आणि सेंद्रिय कर्ब यांची अचूक माहिती मिळते. त्यामुळे योग्य प्रमाणात खतांचा वापर करता येतो आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
कधी आणि कुठे कराल माती परीक्षण?
माती परीक्षणासाठी उन्हाळा (एप्रिल-मे) हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो, कारण त्या वेळी शेत बहुतेक मोकळे असते.
शेतकरी आपले माती नमुने कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी जमा करू शकतात.
माती परीक्षणाचे प्रमुख फायदे
* खत व्यवस्थापन
जमिनीतील पोषक तत्त्वांच्या उपलब्धतेनुसार संतुलित खतांचा वापर करता येतो.
* खर्चात बचत
अनावश्यक रासायनिक खतांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च कमी होतो.
* जमिनीची सुपीकता
जमिनीचा पोत खराब होण्यापासून वाचतो आणि दीर्घकाळ उत्पादनक्षम राहतो.
* पीक नियोजन
जमिनीच्या प्रकारानुसार कोणते पीक अधिक फायदेशीर ठरेल याचा अंदाज येतो.
वैज्ञानिक शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल
माती परीक्षण आणि मृद आरोग्य पत्रिका यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अचूक माहिती मिळते. परिणामी खतांचा संतुलित वापर, उत्पादनवाढ आणि खर्चात बचत या तिन्ही बाबींमध्ये फायदा होतो. त्यामुळे कृषी विभागाचा हा उपक्रम वैज्ञानिक व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
