नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून प्रस्तावित ६६.१५ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्ग प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत ६० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमती दर्शवल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक प्रक्रियेत भूसंपादनासाठी सुमारे १५० दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना, प्रशासनाने अवघ्या ६७ दिवसांत थेट खरेदीद्वारे ३३ गुंठे जमीन संपादन करून कामाला वेग दिला आहे.
हा वर्तुळाकार मार्ग शहरालगतच्या २५ गावांमधून जाणार असून, ३६५ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. चार राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्य महामार्गांना जोडणारा हा मार्ग केवळ कुंभमेळ्यातील वाहतूक सुलभकरण्यापुरता मर्यादित न राहता नाशिकच्या भविष्यातील शहरी विकासाचा कणा ठरणार आहे. आतापर्यंत सात गावांमध्ये सर्वेक्षण व संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, दहा गावांमध्ये प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
तर उर्वरित आठ गावांमध्ये काही तांत्रिक बदल आणि स्थानिक अडचणींमुळे सर्वेक्षण बाकी आहे. काही संवेदनशील गावांमध्ये पोलीस संरक्षणात सर्वेक्षण करावे लागणार असल्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रशासनाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तरीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने वेगवान निर्णयप्रक्रिया आणि थेट खरेदी धोरणाचा अवलंब करत प्रकल्पाला 'फास्ट ट्रॅक'वर आणले आहे. त्यामुळे सिंहस्थपूर्वी नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- ३६५ हेक्टर. जमीन संपादन होणार
- ३३ गुंठे जमिनीचे थेट खरेदीने पहिले यशस्वी संपादन.
- ०७ गावे सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे
- १० गावे सर्वेक्षणाच्या अंतिम टप्प्यात
- ०८ गावे प्रलंबित/तांत्रिक बदल असलेली (एकूण २५ गावे)
गावनिहाय सर्वेक्षणाची प्रगती
प्रकल्पासाठी एकूण २५ गावांमधून मार्ग जाणार असून, त्यापैकी सात गावांमध्ये सर्वेक्षण व संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. दहा गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण होऊन मोजणी पत्रके सादर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. उर्वरित आठ गावांमध्ये काही तांत्रिक बदल आणि स्थानिक अडचणींमुळे सर्वेक्षण बाकी असून, ते लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
संवेदनशील भागात वाढलेली प्रशासनाची खबरदारी
काही गावांमध्ये विरोध आणि मार्गातील बदलांमुळे सर्वेक्षण प्रक्रिया संवेदनशील ठरत आहे. विशेषतः पिंपळगाव खांब, पिंपळगाव बहुला, मुंगसरे आणि मातोरी या गावांमध्ये पोलिस संरक्षणात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच, काही ठिकाणी मार्गाच्या संरेखनात बदल प्रस्तावित असल्याने प्रशासनाला अतिरिक्त नियोजन करावे लागत आहे.
