छत्रपती संभाजीनगर : पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हा ही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. या माध्यमातून फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम (Solar Village) केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील (Marathwada) पहिलेच गाव ठरले आहे.
पोफळा (Pophala Village) ता. फुलंब्री हे तसे लहानसे पण जरासे न्यारे गाव. गावात अवघा ७७ उंबरठा. पण समुद्रसपाटीपासून ७२५ मिटर उंचावर. एका कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे गाव संपूर्ण सौर ऊर्जेवर (Solar Energy Power) आणण्याचे ठरवले. त्यासाठी महावितरणने त्यांना सहयोग दिला. महावितरणने ह्या गावाचा अधिभार नियमित करण्यासाठी १०० केव्हीचे रोहित्र बसवून दिले. त्यामुळे वीज पुरवठा पुर्णवेळ सुरु राहू शकतो.
गावाने एक होऊन संपूर्ण वीज चोरी बंद केली. त्यानंतर ग्रीड पुरवठा पद्धतीने प्रत्येक घरावर १ केव्ही क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यात आले. त्यासाठी प्रति पॅनेल, फिटींग, मिटर बसविणे असा प्रत्येक कुटुंबासाठी ५१ हजार रुपयांचा खर्च कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केला. एप्रिल महिन्यापासून संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर शिफ्ट झाले, अशी माहिती एन्ड्युरन्सच्या सामाजिक उपक्रम विभागाचे सहा. व्यवस्थापक उदय दुधगावकर यांनी दिली. या शिवाय गावातील शाळा, जलसंधारण, वृक्ष लागवड अशी इतर कामेही या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून झाली आहेत.
संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आल्यामुळे गावातील वीज चोरी पूर्ण बंद झाली. सर्व जोडण्या वैध झाल्या. शिवाय प्रत्येक सौर पॅनेल सोबत घरावर वीज अटकाव यंत्रे, अर्थिंगही लावण्यात आली. त्यामुळे सुरक्षितता आपोआप वाढली. संपूर्ण सौरग्राम झालेले पोफळा हे गाव संपूर्ण मराठवाडा विभागातील पहिलेच गाव ठरले आहे,असा दुजोरा महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे.
आता हीच कंपनी येत्या वर्षात म्हणजेच सन २०२५-२६ मध्ये मुंबापूरवाडी ता. खुलताबाद ह्या गावाला संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्यासाठी काम करीत आहे. अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक करुन किमान कार्बन उत्सर्जन करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जा विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.
कृषीपंपांना दिवसा वीज?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती महावितरण कडून प्राप्त झाली आहे.