Pokhara Scheme : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Pokhara Scheme) अंतर्गत पोर्टलवर झालेल्या तांत्रिक चुकीमुळे सुलतानपूर येथील शेतकरी अनेक दिवसांपासून शासकीय लाभापासून वंचित राहत होते. (Pokhara Scheme)
मात्र, ही बाब वृत्तातून समोर आल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेत पोर्टलवरील त्रुटी दुरुस्त केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Pokhara Scheme)
लाडसावंगी बी.टी. अंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर गावाच्या नावाबाबत पोर्टलवर चुकीची नोंद झाल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
गावाचा कोड व नाव चुकीचे दाखविल्यामुळे पात्र शेतकरीही योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची स्थिती निर्माण झाली होती.
नेमकी काय होती अडचण?
पोखरा पोर्टलवर सुलतानपूर गावाचा योग्य कोड ५४८७१९ असताना त्याऐवजी ५४८८११ वरुड काजी असे नाव व कोड दिसत होते. त्यामुळे सुलतानपूर येथील शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज केल्यानंतर ते अर्ज लाडसावंगीतील सुलतानपूर कृषी सहायकाकडे न जाता वरुड सुलतानपूर येथील कृषी सहायकाकडे जात होते.
यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनाही मोठा गोंधळ उडत होता. कृषी सहायक लाभ मंजुरीसाठी गावात गेल्यावर अर्जदार शेतकरी त्या गावातील नसल्याचे लक्षात येत होते.
अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या गावांतील शेतकरी व अधिकाऱ्यांना या तांत्रिक चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता.
शेतकरी व अधिकारी दोघेही हैराण
दोन्ही गावांची नावे सारखी असल्याने पोर्टलवरील चुकीच्या क्रमांकामुळे अनेक शेतकरी अर्ज प्रक्रियेत अडकले होते.
शेती एका गावात असताना सातबारा दुसऱ्या गावाचा असल्याचा गैरसमज निर्माण होत होता. परिणामी अर्जांची पडताळणी व मंजुरी प्रक्रिया लांबत होती.
वृत्तानंतर प्रशासनाची दखल
ही समस्या 'लोकमत'ने प्रकाशित केल्यानंतर कृषी विभाग व महसूल विभागाने तत्काळ हालचाल करत पोर्टलवरील तांत्रिक चूक दुरुस्त केली. त्यामुळे आता सुलतानपूर गावातील शेतकऱ्यांचे अर्ज योग्य ठिकाणी पाठविले जात असून रखडलेल्या लाभ मंजुरी प्रक्रियेला वेग येणार आहे.
शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
पोर्टलवरील दुरुस्तीनंतर एका शेतकऱ्याने पोखरा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाचा अर्ज भरून पाहिला असता तो पुढील प्रक्रियेसाठी योग्यरित्या वर्ग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत संबंधित माध्यमांचे आभार मानले.
अर्ज प्रक्रिया सुरूच
पोखरा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज पोखरा समितीसमोर ठेवून मंजूर करण्यात येतील आणि खरीप पेरणीपूर्वी लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती कृषी सहायक सुधाकर पाटील यांनी दिली.
या तांत्रिक दुरुस्तीमुळे सुलतानपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या योजना मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर
