Sugar Factory FRP : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. असे असताना अनेक कारखान्यांकडे एफआरपी थकित आहे. सदर एफआरपीची देय रक्कम कायद्यानुसार व्याजासह अदा करावी, अन्यथा न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे निलेश शेडगे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे निलेश शेडगे या साखर कारखान्यांना जाब विचारला आहे. ते म्हणाले की, साखर कारखानदारीच्या व्यवस्थापनावर टिका केली असून आर्थिक अडचणीचे कारण देत कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकविली आहे.
यात सभाससद शेतकऱ्यांचा दोष नसून आर्थिक कुवत नसताना गाळप क्षमतावाढ करणे, कर्ज काढून 'अर्थपूर्ण' हेतूसाठी नवे प्रकल्प उभारण्याचे प्रताप करणे. यामुळेच आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यात व्यवस्थापन दोषी आहे. त्याची शिक्षा ऊस उत्पादकांना कशासाठी असा सवाल शेडगे यांनी उपस्थित केला आहे.
आठ दिवसांत एफआरपी द्या
जे आर्थिक अडचणीचे कारण देतात, त्यांचे खाजगी कारखाने माञ नफ्यात आहेत. अनेक कारखान्यांनी कामगारांचे पगार थकित असताना कामगारांच्या नावावर ऋण काढले जात आहेत. अशा स्थितीत संचालक मंडळ माञ अलबेल आहे. आता शेतकऱ्यांचा संयम सुटला असून आयजीच्या जीवावर बायजी करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनाने येत्या आठ दिवसात थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह व कामगारांचे थकित वेतनाची रक्कम अदा करावी, अशी मागणी शेडगे यांनी केली आहे.
