- रामदास बोरकर
शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीच्या आरोग्यासह मानवी आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होत आहे. विविध आजारांची लागण होत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळा, असा सल्ला कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना देत आहेत.
हीच बाब अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक प्रगतिशील शेतकरी महिलेने आत्मसात करीत सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. शिवाय परसबागेत सुद्धा सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड करून जमिनीच्या आरोग्यासह मानवाचे आरोग्य सुद्धा जपण्याचे काम करीत आहे. नीलिमा बोरकर असे शेतकरी महिलेचे नाव आहे.
नवेगावबांध येथील नीलिमा बोरकर यांची शंभर टक्के नैसर्गिक परसबाग म्हणजे कष्ट, शिस्त आणि निसर्गाशी जपलेले नाते यांचे सुंदर उदाहरण आहे. घराच्या परसबागेत त्यांनी वांगी, मिरची, टोमॅटो, कांदे, लसूण यांसारख्या दैनंदिन वापरातील भाज्या तसेच कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्या पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या आहेत.
तसेच चवळी, वाल, बीट आणि मुला यामुळे घरातील आहार अधिक पौष्टिक व विविधतापूर्ण बनतो. एवढेच नव्हे, तर या परसबागेत शेवगा, पपई, केळी, आंबा आणि पेरू यांसारखी फळझाडेही बहरलेली आहेत. घरच्या दोन गायी व वासरांसाठी आवश्यक असलेला हिरवा नैसर्गिक चारादेखील याच सेंद्रिय परसबागेतून उपलब्ध होतो. त्यामुळे पशुपालन आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधला गेला आहे.
नीलिमा बोरकर यांची दिनचर्या सकाळी लवकर उठण्यापासून होते. प्रथम त्या गायी-वासरांची देखभाल करतात, त्यांना चारा-पाणी देतात. त्यानंतर परसबागेतील झाडांना पाणी घालणे, तण काढणे, सेंद्रिय खत टाकणे, अशी कामे मन लावून करतात. दुपारपर्यंत घरातील स्वयंपाक व इतर कामे सांभाळून पुन्हा सायंकाळी बागेची पाहणी करणे हा त्यांचा रोजचा क्रम आहे.
भाजीपालाही आहे रुचकर
कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, गांडूळ खत आणि नैसर्गिक उपायांनी त्यांनी ही बाग जोपासली आहे. त्यामुळे पिके निरोगी, चविष्ट आणि सुरक्षित आहेत. ही परसबाग केवळ अन्न उत्पादनाचे साधन नसून स्वावलंबन, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी आदर्श ठरले आहे.
