विठ्ठल भिसे
पाथरी तालुक्यातील किन्होळा गावाने पारंपरिक शेतीला पर्याय शोधत कांदा बियाणे उत्पादनात उल्लेखनीय झेप घेतली आहे.२०१५ मध्ये प्रयोगात्मक पातळीवर सुरू झालेली लागवड आज तब्बल १७५ एकरांवर पोहोचली असून, गावाची ओळखच 'कांदा सीड हब' अशी निर्माण झाली आहे.
कापसावर अवलंबून असलेले स्थानिक अर्थकारण आता मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्याभोवती फिरताना दिसते.
९० शेतकरी, १७५ एकरांवर कांदा बियाणे
गावात एकूण १३९५ एकर शेतजमीन असून ५५० खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ९० शेतकऱ्यांनी १७५ एकरांवर कांदा बियाणे लागवड केली आहे.
उत्पन्न वाढत असल्याने दरवर्षी क्षेत्रात वाढ होत आहे. याच धर्तीवर पाथरी तालुक्यातील खर्डा, वडी, डोंगरगाव, रेणाखळी या गावांतही मिळून सुमारे ३२५ एकरांवर कांदा बियाणे लागवड केली जात आहे.
बदलले गावाचे अर्थकारण
कांदा बियाण्यामुळे गावातील आर्थिक उलाढाल लक्षणीय वाढली आहे. चार महिन्यांच्या हंगामात साडेतीन कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.
वाढलेल्या उत्पन्नामुळे घरांची बांधकामे, शेतीतील यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा आणि मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक वाढल्याचे चित्र दिसत आहे.
कापसात खर्च जास्त आणि दर अनिश्चित असायचे. कांदा बियाण्यात खर्च मर्यादित असून बाजारपेठ ठरलेली आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी लाखोंचे उत्पन्न मिळते.- शुभम कणसे, कांदा उत्पादक शेतकरी
प्रमुख बाजारपेठा
कांदा बियाण्याच्या विक्रीसाठी सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही प्रमुख बाजारपेठ केंद्रे आहेत. विशेषतः सिल्लोड येथे मोठी व्यापारपेठ उपलब्ध असल्याने विक्री सुलभ होते.
एकरी लाखोंची उलाढाल
एकरी किमान ३ ते साडेचार क्विंटल बियाणे उत्पादन मिळते. यंदा कांदा बियाण्याला ६० ते ७५ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने एकरी उत्पन्न दोन लाखांच्या घरात जात आहे. परिणामी, गावात शेतीसाठी यंत्रसामग्री खरेदी, ठिबक सिंचन व्यवस्था आणि मजुरांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला आहे.
करार शेतीचा पर्याय
काही शेतकरी बियाणे कंपन्यांशी करार शेती करतात. लागवडीसाठी सुरुवातीला कांदा पुरविला जातो आणि उत्पादन तयार झाल्यानंतर व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात.
त्यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो. मात्र करारातील अटी, दर्जा निकष आणि दरनिश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात.
हवामान व व्यवस्थापन महत्त्वाचे
डिसेंबरमधील गुलाबी थंडी कांदा बियाण्यास पोषक ठरते. कापूस काढणीनंतर डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. एकरी १० ते १३ क्विंटल कांदा लागतो आणि १३० ते १४० दिवसांत पीक तयार होते.
लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. वेळेवर उपाययोजना न केल्यास उत्पादन घटते.
खत व्यवस्थापनात १०:२६:२६, डीएपी आणि युरियाचे दोन टप्प्यांत डोस दिले जातात. खत व फवारणीस मिळून सुमारे १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. शेणखताचा वापर केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होत असल्याचा अनुभव शेतकरी व्यक्त करतात.
आदर्श निर्माण करणारे गाव
कापूस पिकातून अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत कांदा बियाण्याचा पर्याय स्वीकारला आणि गावाचे अर्थकारणच बदलले. आज किन्होळा हे पाथरी तालुक्यात 'कांदा सीड हब' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
अधिक वाचा : Pashupalan Yojana : ग्रामीण तरुणांसाठी गेमचेंजर ठरतेय पशुपालन योजना; जाणून घ्या सविस्तर
