नाशिक : येवला, लासलगाव, निफाड, सिन्नरसह कळवण तालुक्यातील पुनंद खोऱ्यात पहिल्या टप्प्यातील कांद्याची काढणी वेगाने सुरू असताना दोन दिवसांपासून अचानक हवामान बदलल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
'कसमादे' पट्यात कांद्याचे प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या पुनंद खोऱ्यासह कळवण तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने मंगळवार आणि गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने हाती पदरी आलेल्या कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याकडून पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, शेतकरीकांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतात प्लास्टिकच्या साहाय्याने झाकण्याची घाई करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेडमध्ये वाहून आणला जातो.
पुनंद खोरे परिसरात पहिल्या टप्प्यातील शेतातील कांदा काढणीचा हंगाम सध्या जोरात सुरू असून, उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी शेतकरी कांदा काही दिवस शेतातच वाळवला जातो. मात्र, आलेल्या ढगाळ हवामानामुळे पावसाचा टाळण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी हवामानातील बदलामुळे कांदा उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कांद्याच्या काढणीचा हंगाम सध्या जोमात सुरू आहे. कांदा लागवड, खते, औषधे, मजुरी तसेच कुटुंबात जमलेले लग्न या आर्थिक अडचणीतील अनेक शेतकरी म्हणून काढलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणतात.
कांदा उत्पादनावर झालेला खर्च पुनंद खोऱ्यासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे. कांदा साठवणीसाठी योग्य उपाययोजना सुचवणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
- महेंद्र हिरे, शेतकरी, देसराणे
