Join us

Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 15:20 IST

Radhakrushna Vikhe : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

नाशिक : भारतीय कांद्याला (Onion) जगभरात मोठी बाजारपेठ आहे. आजही निर्यातीसाठी ५ लाख कांद्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठाही आहे. परंतु व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

एकीकडे कांदा निर्यातबंदी (Onion export) असल्याने अद्यापही शेतकऱ्यांना समाधानकारक असा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. कांदा निर्यातबंदी उठवली असली तरीही त्यात असलेल्या जाचक अटींमुळे निर्यात रोडावली आहे. व्यापाऱ्यांना कंटेनर आणि इतर अतिरिक्त शुल्क मोजावे लागत असल्याने निर्यात होत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षात १३ टक्क्यांनी निर्यात घटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निर्यात पूर्णतः खुली होण्याची अपेक्षा शेतकरी, व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर विखे पाटील म्हणाले की कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह आहेत. ते शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. निर्यातीसाठी कांदा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. निर्यातमूल्य कमी करण्यासाठी पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते म्हणाले. त्यामुळे गेल्या डिसेंबरपासून रखडलेली निर्यात  होणार? शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव कधी मिळणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

कांदा निर्यात घटली 

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून (Onion Export) ३८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले असले तरी कांदा निर्यातबंदीच्या धरसोडीमुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्के निर्यातीत घटल्याचे अपेडाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :कांदामार्केट यार्डराधाकृष्ण विखे पाटीलनाशिकशेती क्षेत्र