Nuksan Bharpai : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या (crop Damage) रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे. तसेच, कमाल तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे.
राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे (Unseasonal rain), अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी, याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर २०२३ पर्यंत मदत दिली जात होती. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने १ जानेवारी २०२४ रोजी एक जीआर काढला व मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादेतवाढ केली. त्यानुसारच मदत दिली जात होती.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती. मात्र, सूत्रांनी सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने जे निश्चित केले, त्या मर्यादेतच नुकसानीसाठी मदत देणे बंधनकारक आहे, असे केंद्राने राज्याला कळविले आहे. त्यानुसार आता पूर्वीच्या म्हणजे २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे.