गजानन मोहोड
अमरावती : ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना हाताला काम देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) यंदा नव्या वादात सापडली आहे. (NREGA Wage Rate 2026)
दरवर्षी १ एप्रिलपासून मजुरीच्या दरात वाढ करण्याची गेल्या दोन दशकांची परंपरा केंद्र शासनाने यंदा खंडित केली असून, मजुरी जैसे थे ठेवण्यात आली आहे. (NREGA Wage Rate 2026)
महागाईचा भडका उडालेल्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो मजुरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (NREGA Wage Rate 2026)
सध्या महाराष्ट्रात नरेगा अंतर्गत मजुरांना दररोज केवळ ३१२ रुपये इतकी मजुरी दिली जात आहे. यंदा या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा मजुरांनी धरली होती; मात्र केंद्राकडून एक रुपयाचीही वाढ जाहीर न झाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना ३१२ रुपयांत संसाराचा गाडा चालवणे कठीण होत असल्याची भावना मजूर व्यक्त करीत आहेत.
ग्रामीण भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर शेतीची कामे आटोपतात आणि मोठ्या प्रमाणात मजूर नरेगाच्या कामांकडे वळतात.
राज्यात जलसंधारण, फळबाग लागवड आणि ग्रामीण रस्ते बांधणी यांसारखी हजारो कामे प्रलंबित आहेत. साधारणतः राज्यात दररोज १० ते १५ लाख मजूर नरेगाच्या कामांवर कार्यरत असतात, तर देशभरात हा आकडा पाच ते सहा कोटींच्या घरात पोहोचतो.
अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता, सध्या 'मग्रारोहयो'अंतर्गत १८१७ कामे सुरू असून, सुमारे २३ हजार ८५४ मजूर त्यावर कार्यरत आहेत.
मात्र ग्रामरोजगार सेवकांच्या संपामुळे अनेक ठिकाणी कामांची मागणी नोंदवली जात नसल्याने सुमारे ३० हजार मजुरांचा रोजगार ठप्प झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरवर्षी या काळात चार हजारांहून अधिक कामे सुरू असतात आणि ५० ते ६० हजार मजुरांची उपस्थिती राहते.
मजुरीचे दर कसे ठरतात?
नरेगा अंतर्गत मजुरीचे दर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडे असतो. ही दरवाढ प्रामुख्याने शेतमजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI-AL) आधारित असते. दरवर्षी मार्चअखेरीस नवीन दर जाहीर करण्याची पद्धत आहे; मात्र यंदा ही प्रक्रिया पार पडूनही दरवाढ न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मजुरी दरांचा आढावा (रुपये)
२००६-०७ : ६५
२०१०-११ : १००
२०१५-१६ : १८१
२०२०-२१ : २३८
२०२५-२६ : ३१२
२०२६-२७ : ३१२ (बदल नाही)
मजुरांच्या अपेक्षा वाढल्या, पण निर्णयाने निराशा
महागाईच्या पार्श्वभूमीवर मजुरीत किमान वाढ होईल, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली होती. मात्र केंद्राच्या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे भविष्यात नरेगा अंतर्गत कामांमध्ये मजुरांचा प्रतिसाद कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण रोजगाराचा कणा मानल्या जाणाऱ्या नरेगा योजनेत मजुरीवाढीला ब्रेक लागल्याने शेतमजुरांचे गणित बिघडले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा :MGNREGA Gotha Yojana : 'मागेल त्याला काम' कुठे गायब? गोठा योजना रखडली
