प्रवीण जंजाळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी देण्यात आलेल्या अनुदानात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. २०२२-२३ मध्ये तब्बल २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आले आहे. (Naisargika Apatti Anudana)
यामुळे प्रशासनाची मोठी गोची झाली आहे. सध्या या चुकीची दुरुस्ती करताना महसूल विभागाने वसुली मोहिम सुरू केली आहे. (Naisargika Apatti Anudana)
शेतकऱ्यांना दिलेले अनुदान आता डोकेदुखी ठरते आहे. सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन वेळा गेलेली रक्कम, आता परत मागितली जात आहे.
२ हजार ३९९ शेतकऱ्यांना मिळालेलं हे डबल अनुदान प्रशासनासाठी संकट ठरतंय, आणि शेतकरी गोंधळलेत. (Naisargika Apatti Anudana)
ऑडिटनंतर उघडकीस आला प्रकार
राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीत पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी निकष निश्चित केले होते. त्यानुसार अनुदानाचे वाटप झाले. मात्र, लेखा परीक्षणात उघडकीस आले की, काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकापेक्षा अधिक वेळा अनुदान जमा झाले.
सॉफ्टवेअरच्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, आता वसुलीचा मुद्दा डोकेदुखी ठरत आहे. २ हजार ३९९ शेतकऱ्यांपैकी फक्त ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये परत केले, तर उर्वरित १ हजार ९३१ शेतकऱ्यांनी अद्याप पैसे परत केलेले नाहीत.
कन्नड तालुका आघाडीवर
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सर्वाधिक ६१६ शेतकऱ्यांना डबल अनुदान मिळाले. यापैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे परत केले, जे जिल्ह्यातील सर्वाधिक वसुलीचे प्रमाण आहे.
इतर तालुक्यांतील परतफेडीचे तपशील
तालुका | डबल अनुदान लाभार्थी | रक्कम परत करणारे शेतकरी | वसुली रक्कम (₹) |
---|---|---|---|
कन्नड | ६१६ | ३१२ | २४,२०,७६२ |
सिल्लोड | ६१० | १३५ | १४,५७,६१४ |
वैजापूर | ७२० | ० | ० |
छ. संभाजीनगर | २८५ | ० | ० |
फुलंब्री | २० | १४ | ८३,४८७ |
गंगापूर | ७ | ३ | १७,८५० |
सोयगाव | ५३ | ४ | १०,३३६ |
पैठण | १८ | ० | ० |
खुलताबाद | - | - | ० (अधिकचे अनुदानच नाही) |
शासन व बँकांचा डोकेदुखीचा विषय
ज्या शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळाले, त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, संबंधित बँकांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. अनेक शेतकरी मात्र पैसे परत करण्यास टाळाटाळ करत आहेत.
शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे सुमारे २०% वसुली झाली आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करावेत तरी कसे, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे.
एकदा पैसे परत... आता मागायला लागले
विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडून शासनाने जास्तीचे पैसे वसूल केले आहेत, ते शेतकरी आता तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत, पैसे परत मागण्यासाठी! यामुळे स्थानिक प्रशासनाची अवस्था पैसे घेऊन पुन्हा मागणाऱ्यांची झाली आहे.
सिस्टमवर अवलंबून राहताना मानवी व सॉफ्टवेअरच्या चुका शेतकऱ्यांच्या अनुदानावर गंभीर परिणाम करू शकतात.
शासनाने एकदा पैसे दिल्यावर परत मागणे ही गोष्ट शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज ठरते.
सॉप्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पेक्षा अधिक वेळा रक्कम गेली होती. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने २० टक्क्यांच्यावर रक्कम शासन खात्यात जमा झाली आहे. - विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड