Marathwada Flood : मराठवाड्यातील शेतकरी सध्या महापुर आणि अतिवृष्टीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. एकूण ३१ लाख ९८ हजार ४६७ हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून त्यापैकी २३ लाख ६० हजार ३६८ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. (Marathwada Flood)
नुकसानीसाठी शासनाने मंजूर केलेल्या १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू झाले असले तरी बँक केवायसीची अट शेतकऱ्यांसाठी अडसर ठरत आहे.(Marathwada Flood)
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
मागील दोन दिवसांपासून पावसाचे संकट ओसरले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
पुढील चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
शासनाने १८ व २३ सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत १५०० कोटींची रक्कम दिली असून गावनिहाय याद्या व व्हीकेएन नंबर प्रसिद्ध केले जातील.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
केवायसी का गरजेची?
आयुक्त पापळकर यांनी सांगितले की, शेती व शेतकऱ्यांच्या नोंदींमध्ये वारंवार बदल होत असतात. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीकडे मदत जाण्यापेक्षा योग्य शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचावी, यासाठी केवायसी आवश्यक आहे.
त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की,
बँकांनी या मदतनिधीवर कर्जाचे हप्ते कपात करू नयेत.
काही बँकांमध्ये 'ऑटो पे' सुविधा असल्यास शेतकऱ्यांनी अर्ज करून त्यातून सूट घ्यावी.
विसर्गामुळे स्थलांतर
जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने २४ हजार ७०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
त्यापैकी १७ हजार ७८५ जण अद्याप निवारागृहात असून
६ हजार ७८१ जण घरी परतले आहेत.सध्या कोणताही नागरिक पुरात अडकलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्हानिहाय पाण्याखालील शेती (हेक्टरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर : २,३६,५२८
जालना : २,३२,०८२
परभणी : २,७३,०३३
हिंगोली : २,७३,४१३
नांदेड : ६,५४,४०१
बीड : ६,७५,८९१
लातूर : ४,०३,४३८
धाराशिव : ४,४९,६८१
एकूण : ३१,९८,४६७ हेक्टर
केंद्राच्या पथकाची प्रतीक्षा
मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक केव्हा येणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. यावेळी अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळवण्यासाठी केवायसीची अट पूर्ण करावी लागणार आहे. मदतनिधी बँक खात्यात जमा होणार असला तरी तो कर्जाच्या हप्त्याला समायोजित करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.