Marathwada Crop Damage : गेल्या दहा दिवसांत मराठवाड्यात अनेक भागांत वारंवार आलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा संकट आले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, सुमारे ४८ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रातील तब्बल २४ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, म्हणजेच ५० टक्के पिकांचा चिखल झाला आहे. (Marathwada Crop Damage)
या स्थितीमुळे खरीप कृषी उत्पादनात घट होणार असून, आगामी काळात महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Marathwada Crop Damage)
नुकसानीची व्यापक परिस्थिती
नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत ७६ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पंचनाम्यांना वेग आलेला नाही. शेतांमध्ये पाणी ओसरत नसल्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया मंदावलेली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक संकट
पेरणीसाठी बँकांकडून अपेक्षित पीक कर्ज पुरवले गेलेले नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी बियाणे उधारीवर किंवा सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती. आता पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बियाण्याचे कर्ज, सावकारांचे देणे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
पुराचा तडाखा
अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे ८६ जणांचा मृत्यू आणि १७२५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे अनेक भागांमध्ये शेती वाहून गेली असून, त्यामुळे शेतकरी आणि गावकरी दोघांनाही गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे.
जिल्हानिहाय पिकांचे नुकसान
जिल्हा | पेरणी क्षेत्र (हेक्टर) | नुकसान क्षेत्र (हेक्टर) |
---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | ६६०,५५२ | १६४,२८७ |
जालना | ६२९,०२१ | ६०,१६७ |
परभणी | ५१२,२१६ | १६१,३२१ |
हिंगोली | ३४३,४१५ | २७३,४१३ |
नांदेड | ७५६,०५२ | ६५४,४०१ |
बीड | ७५८,९६७ | ४४६,१७० |
लातूर | ५८९,०१० | ४०३,४३८ |
धाराशिव | ५७२,२०३ | २३२,९६२ |
एकूण | ४८,२१,३६६ | २४,९६,१५९ |
खरीप पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसानीमुळे डाळी, तूर, सोयाबीन यांसारख्या धान्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढेल, परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
पीक कर्ज आणि उधारीच्या परतफेडीचा प्रश्न तात्काळ सोडवणे गरजेचे आहे.