जयेश निरपळ
शासनाने मका खरेदीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी गांगापूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर मात्र उलट चित्र दिसून येत आहे.(Makka Kharedi)
प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.(Makka Kharedi)
मका विक्रीसाठी शेतकरी मोठ्या अपेक्षेने खरेदी केंद्रावर पोहोचत असले, तरी केंद्रावर कामकाज संथ गतीने सुरू असल्याने त्यांना रखरखत्या उन्हात आणि उघड्यावरच थांबावे लागत आहे.
सकाळी लवकर खरेदी प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना संबंधित कर्मचारी दुपारच्या सुमारास म्हणजे सुमारे १२ वाजेपर्यंत केंद्रावर पोहोचतात. त्यामुळे दिवसभरात केवळ १० ते १२ वाहनांमधील मका रिकामा केला जातो.
दरम्यान, सुमारे ३५० हून अधिक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीनंतर मका विक्रीसाठी संदेश पाठविण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात खरेदीची गती अत्यंत संथ असल्याने केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
मका घेऊन आलेले ट्रॅक्टर व मालवाहू वाहने तीन ते चार दिवस रिकामी होत नसल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त वाहनभाड्याचा भार सहन करावा लागत आहे.
अनेक शेतकरी दिवसभर उन्हात थांबूनही मका विक्री न झाल्याने सायंकाळी निराश होऊन घरी परतत आहेत, तर काहींना केंद्राच्या आवारातच रात्री मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत असल्याची तक्रार होत आहे.
सध्या खरेदी केंद्रावर तहसील प्रशासनाकडून केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याकडे मका खरेदीसह पुरवठा विभागाचे काम अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी येत असताना प्रशासनाने स्वतंत्र कर्मचारी का नियुक्त केला नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मी गेल्या तीन दिवसांपासून मका विक्रीसाठी येथे आलो आहे. कर्मचारी उशिरा येत असल्याने आम्हाला ताटकळत बसावे लागते. अजून दोन दिवस तरी मका खरेदी होईल की नाही, याची खात्री नाही.- गोविंद हिवाळे, शेतकरी
दरम्यान, खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या या दिरंगाईमुळे शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाने तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून मका खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : हमीभावाने हरभरा विकायचा? मग 'या' अटी पूर्ण असणे बंधनकारक
अधिक वाचा : Flower Market : फुलांच्या बाजारात मोठी तेजी; मोगरा ९०० तर काकडा १२०० रुपये किलो
