जळगाव : महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर राज्य वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षाकरिता दरात कपात केली आहे. दि. १ एप्रिलपासून ग्राहकांना स्वस्त दराचा लाभ मिळणे सुरू होणार आहे. महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा एकूण ८ लाख ५ हजार ९६२ ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षाच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश दि. २५ मार्च रोजी, प्रसिद्ध केला आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत.
पूर्वीपेक्षा अधिक सवलत
आयोगाने पाच वर्षांसाठी दिलेल्या आदेशापैकी १ एप्रिल २०२६ पासून दुसरे वर्ष सुरू होत आहे. परिणामी वीज ग्राहकांना यापूर्वीच्या दरापेक्षा अधिक सवलत मिळणार आहे. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. २०२२-३० या आर्थिक वर्षापर्यंत ते दरवर्षी १ एप्रिल रोजी आणखी कमी होत जातील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उद्योग, व्यावसायिक ग्राहकांनाही लाभ...
उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीज दरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत मिळणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७८ पैसे यावरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होणार आहे.
घरगुतीसाठी असा आहे बदल...
१०० युनिटपर्यंत - जुने दर - ७ रुपये ३१ पैसे तर नवे दर - ७ रुपये १० पैसे
१०१ ते ३०० उंचीपर्यंत - जुने दर - १३ रुपये १७ पैसे तर नवे दर - १२ रुपये ९४ पैसे
स्मार्ट मीटरलाही लाभ...
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीसाठीच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ८० पैसे सवलत मिळत होती. ती आता २०२६-२७ या आर्थिक वर्षात ८५ पैसे प्रति युनिट इतकी सवलत असेल.
