रऊफ शेख
शेती अधिक सुलभ, शास्त्रशुद्ध आणि नफ्यात आणण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'महाविस्तार एआय' ॲपला फुलंब्री तालुक्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.(Mahavistar AI App)
फुलंब्री तालुक्यातील सुमारे ५६ हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ ४ हजार शेतकऱ्यांनीच हे ॲप डाऊनलोड केले आहे. (Mahavistar AI App)
उर्वरित ५२ हजार शेतकरी अद्याप या डिजिटल प्लॅटफॉर्मपासून दूर असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.(Mahavistar AI App)
'महाविस्तार एआय' म्हणजे काय?
'महाविस्तार एआय' (Mahavistar AI App) हे महाराष्ट्र शासन कृषी विभागने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे.
यात एआय चॅटबॉट सुविधा उपलब्ध असून शेतकरी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
पेरणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, सिंचन नियोजन, काढणी व साठवणूक अशा सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन देण्याची क्षमता या ॲपमध्ये आहे.
हवामानाचा अचूक अंदाज
या ॲपद्वारे गावनिहाय पाऊस, तापमान आणि आर्द्रतेचा रिअल-टाइम अंदाज मिळतो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. वेळेवर निर्णय घेतल्यास पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते.
बाजारभाव घरबसल्या
विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील ताज्या बाजारभावांची माहिती ॲपवर उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्या बाजारात चांगल्या दरात विकता येईल, याचे नियोजन करणे सोपे होते. योग्य बाजारपेठ निवडल्यास नफ्यात वाढ होऊ शकते.
रोगनिदान व योजना माहिती
पिकावर रोग दिसल्यास त्याचा फोटो ॲपवर अपलोड केल्यावर संभाव्य रोग ओळखून उपाययोजना सुचवल्या जातात. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अर्जाची स्थिती ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मृदा आरोग्य पत्रिकेचा अहवाल समजून घेण्यासाठी आणि जमिनीच्या प्रकारानुसार खतांचे योग्य प्रमाण निश्चित करण्यासाठीही हे ॲप उपयुक्त ठरते.
प्रतिसाद कमी का?
फुलंब्री तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत. स्मार्टफोन वापरातील मर्यादा, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण, डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि तंत्रज्ञानाबाबतचा संकोच ही कारणे पुढे येत आहेत.
शासनाकडून तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्ष पातळीवर प्रशिक्षण व जनजागृती अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे दिसते.
अधिकाऱ्यांचे आवाहन
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज आहे.
'महाविस्तार एआय'मुळे सल्लागारांवरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात बचत आणि नफ्यात वाढ शक्य आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही त्वरित अॅप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
'हायटेक' शेतीसाठी जागरूकतेची गरज
शासनाची डिजिटल क्रांती प्रत्यक्ष शेतात पोहोचण्यासाठी केवळ ॲप विकसित करणे पुरेसे नाही; तर गावपातळीवर प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रे आवश्यक आहेत.
अन्यथा आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही.
फुलंब्री तालुक्यातील चित्र हे राज्यातील इतर भागांसाठीही संकेत देणारे ठरू शकते. डिजिटल शेतीची दिशा योग्य असली, तरी तिची अंमलबजावणी आणि स्वीकार हीच खरी कसोटी ठरणार आहे.
अधिक वाचा : UMED Scheme : उमेद गटांना मिळालं मोठं गिफ्ट; महिलांना लाखोंची मदत जाहीर!
