सोमेश्वरनगर : १६ डिसेंबर २०२५ पासून, सोमेश्वर कारखान्याकडे आलेल्या आणि पुढे येणाऱ्या उसाच्या बिलातून कोणत्याही सोसायटी आणि व्यापारी बँकांची कर्ज वसुली केली जाणार नसल्याचा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत घेतल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप पुढे म्हणाले की, शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त आणि किफायतशीर दर (एफ.आर.पी) टनाला ३ हजार २८५ रुपये आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी टनाला ३ हजार ३०० रुपये देण्याचे निश्चित केले आहे.
१५ डिसेंबर अखेर ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने आजअखेर ६ लाख ३४ हजार १३५ मे. टनाचे गाळप पूर्ण केले आहे. जिल्ह्यात ११.२७ टक्के प्रमाणे उच्चांकी साखर उतारा राखत ७ लाख १० हजार ६५० क्विंटल उत्पादन झाल्याची माहिती जगताप यांनी सांगितली.
जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी नोंदलेला सर्व ऊस वेळेत गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संचालक मंडळाच्या सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार, १६ डिसेंबर २०२५ पासून आलेल्या आणि पुढे येणाऱ्या उसाच्या बिलातून कोणतीही सोसायटी व व्यापारी बँकांची कर्ज वसुली केली जाणार नाही, आणि कर्ज वसुली ऐच्छिक करण्यात आली आहे.
तसेच कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांना फेब्रुवारी २०२६ मध्ये येणाऱ्या उसास प्रतिटन १०० रुपये, मार्च २०२६ मध्ये येणाऱ्या ऊसास प्रति टन २०० रुपये, आणि एप्रिल २०२६ मध्ये येणाऱ्या उसास प्रतिटन ३०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.
मुबलक प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध
कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध आहे, त्यामुळे ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी झाल्यास, कारखान्याच्या शेतकी खात्याशी संपर्क करावा.
तसेच सभासदांनी आपला ऊस जळीत करून तोडणी करण्यासाठी संमती देऊ नये. कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखान्यांना देऊ नये अथवा अन्यत्र विल्हेवाट लावू नये, असे आवाहन जगताप यांनी लावूनय, यावेळी केले आहे.
