नाशिक : एकूण असलेल्या कर्जावरील व्याज सवलतीच्या सामोपचार योजनेला (ओटीएस) जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांनी ठेंगा दाखविला असून, मागील सहा महिन्यात केवळ ४१ कोटी रुपये वसूल झाल्याने ताळेबंद पुन्हा बिघडल्याने बँकेची आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या दीड वर्षातील ही सर्वांत कमी कर्जवसुली ठरली आहे. त्यामुळे येणाऱ्या शेती हंगामात पीककर्ज वाटप करण्यासाठी बँकेला आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
जिल्हा बँकेची थकीत कर्जाची वसुली संथगतीने सुरू आहे. विशेष सभेत थकीत कर्जावरील व्याजदरात सवलतीची सामोपचार (ओटीएस) योजना मंजूर झाल्यानंतर मागच्या वर्षभरात किमान २०० कोटी थकीत कर्जाची वसुली होईल, अशी आशा बँकेला होती. मात्र अथक प्रयत्न करूनदेखील तसे झाले नाही. त्यामुळे बँकेने आता काटकसरीचे धोरण आखले आहे.
विशेष म्हणजे बँकेतील कर्मचाऱ्यांनाच आता बँकेत जास्तीत जास्त ठेवी जमा व्हाव्यात यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात पहिलेच झालेली १५ ते २० टक्के कपात त्यात आता ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट, त्यात दुसरीकडे इतके प्रयत्न करून देखील सामोपचार योजनेस मिळालेला कमी प्रतिसाद बँकेला आर्थिक वर्ष संपत असताना आर्थिक अडचणीचे ठरत आहे.
थकबाकीदार ७५ हजार, २८५१ शेतकऱ्यांना लाभ
जिल्हा बँकेचे ७५ हजार थकबाकीदार असून, त्यांच्यासाठी व्याजात घसघशीत सवलत देणारी ओटीएस योजना आणूनदेखील सहा महिन्यांत यापैकी केवळ २८५१ शेतकऱ्यांनीच शनिवारअखेर (दि.७) या योजनेचा लाभ घेऊन ४१ कोटींचे थकीत कर्ज बँकेत भरले. त्यामुळे बँकेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
यामुळे कर्जवसुलीस खीळ
अतिवष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारने कर्ज वसुलीस दिलेली स्थगिती, विधानसभा निवडणूक काळात सत्ताधारी गटाने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन तसेच सरकारी यंत्रणेच्या हालचालीनंतर कर्जमाफीची लागून राहिलेली शेतकरी सभासदांना आशा या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे कर्जवसुलीला खूप मोठी खीळ बसली आहे.
५८ हजार सभासद; ६६९ कोटींचे कर्ज
जिल्ह्यातील ५८ हजार शेतकरी सभासदांचे ७६ हजार ६४७ खाते असून, त्यांच्याकडे तब्बल ६६९ कोटींची थकबाकी असल्याने बँकेची कोंडी झाली आहे. शेतकरी कर्जवसुलीस स्थगिती असताना सामोपचार योजनेतून स्वेच्छेने कर्ज भरण्याचे आवाहन बँकेने केले होते.
