अकोला : राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड झाली आहे. (Krushi Yantrikaran Yojana)
कृषी आयुक्तालयाकडून ३ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(Krushi Yantrikaran Yojana)
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या (MahaDBT Portal) माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर तसेच इतर कृषी यंत्रे व अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यामुळे शेतीतील कामे सुलभ होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे.(Krushi Yantrikaran Yojana)
५९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची निवड
२०२५-२६ या आर्थिक वर्षात अकोला जिल्ह्यात एकूण ५९ हजार ९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केली आहेत, त्यांनाच अनुदान वितरित केले जात आहे.
आतापर्यंत ७.२७ कोटींचे वितरण
१७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २० शेतकऱ्यांना ७ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर आता नव्याने प्राप्त झालेल्या ३.३६ कोटी रुपयांच्या निधीमुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
थेट खात्यात जमा होणार रक्कम
कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जलद होत असल्याचे चित्र आहे.
अधिकाऱ्यांची माहिती
कृषी उपसंचालक हरीष देशमुख यांनी सांगितले की, “कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या ३.३६ कोटी रुपयांच्या निधीतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.”
यांत्रिकीकरणामुळे शेतीला बळ
कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री वापरणे शक्य होत असून, मजुरी खर्च कमी होण्यासोबतच उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
नव्याने प्राप्त झालेल्या निधीमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेतीत आधुनिकतेकडे वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.
अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!
