Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांसमोर वाढत्या मशागतीच्या खर्चाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (Kharif Season)
नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर, पेरणीपूर्व मशागत, ट्रॅक्टर भाडे, डिझेल दरवाढ आणि मजुरीतील वाढ यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक शेतकरी आर्थिक तणावाखाली आले आहेत.(Kharif Season)
यंदा डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम कृषी मशागतीवर झाला आहे. ट्रॅक्टर मालकांनी भाडेदर वाढवल्याने शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा वाढता खर्च मोठी डोकेदुखी ठरत आहे.(Kharif Season)
मशागतीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टर मशागतीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. डिझेल दरवाढ, यंत्रसामग्रीच्या देखभालीचा खर्च आणि मजुरी वाढल्यामुळे ट्रॅक्टर भाडे वाढवावे लागल्याचे ट्रॅक्टर चालकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी ट्रॅक्टरचे भाडे प्रति तास आकारले जाते, तर काही भागांत प्रति एकर दराने आकारणी केली जाते. नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि पेरणीपूर्व मशागतीनुसार दर वेगवेगळे आहेत.
असे आहेत मशागतीचे सध्याचे दर
| मशागतीचे काम | दर |
|---|---|
| नांगरणी | ७५० रु. प्रति तास / १,५०० रु. प्रति एकर |
| वखरणी | ७०० रु. प्रति तास / ६०० रु. प्रति एकर |
| रोटाव्हेटर | १,२०० रु. प्रति तास / १,२०० रु. प्रति एकर |
| बेड पाडणे | ७५० रु. प्रति तास / १,२०० रु. प्रति एकर |
| पेरणी | ७०० रु. ते ८०० रु. प्रति एकर |
या वाढलेल्या दरांमुळे पेरणीपूर्व तयारीचा खर्च हजारो रुपयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले
ग्रामीण भागात सध्या मजुरांची टंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने गावांमध्ये शेतीकामांसाठी सहज मजूर उपलब्ध होत नाहीत. परिणामी उपलब्ध मजुरांकडून वाढीव मजुरीची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, पूर्वी मजूर दिवसाला सात ते आठ तास काम करत होते; मात्र आता अनेक ठिकाणी केवळ चार ते पाच तासच काम केले जात आहे. त्यामुळे जास्त मजुरी देऊनही अपेक्षित वेळेत काम पूर्ण होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मजूर लावावे लागत असून त्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढत आहे.
कर्ज आणि उसनवारीवर शेतकऱ्यांचा आधार
खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी सध्या कर्ज, उसनवारी किंवा पतसंस्थांवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. बियाणे, खते, औषधे, मशागतीचा खर्च आणि मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
त्यातच यंदा पावसाचे आगमन वेळेत होईल का, याबाबत अनिश्चितता कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
उत्पादनाला भाव मिळेल का? शेतकऱ्यांची चिंता कायम
यंदा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टर भाडे, डिझेल, बियाणे, खते आणि मजुरी यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मजूर सहज मिळत नाहीत आणि मिळाले तरी जास्त मजुरी द्यावी लागते. उत्पादनाला योग्य भाव मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही.- भगवान लाहुडकार, शेतकरी
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक कसोटीचा
वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई, अनिश्चित पाऊस आणि बाजारातील अस्थिरता यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसोटी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : Kharif Season : सरकारचा मोठा प्लॅन! शेतकऱ्यांसाठी अधिकारी पोहोचणार थेट बांधावर
