नाशिक : भोंदू अशोक खरात जमीन व्यवहारात भरभराट झाल्यानंतर कांदा निर्यात क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या विचारात होता. त्याची पहिली तयारी खरात हा श्री व्यंकटेश फार्मर कंपनीत सपत्नीक संचालक झाला होता.
नंतरच्या काळात कांद्याचे गडगडत असलेले भाव तसेच निर्यातीवरील निर्बंध यामुळे खरातने आपला प्लॅन काही दिवसांसाठी स्थगित करून केवळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली मायापुंजी वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचा एसआयटीला संशय आहे.
फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून खरात काळा पैसा पांढरा करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खरात कांदा निर्यात क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी खरातने काही शेतकरी तसेच निर्यातदारांशी संपर्कदेखील केला होता, परंतु जमीन व्यवहारातून मालामाल झालेल्या खरातला कांदा निर्यात क्षेत्रात वळायला वेळ मिळायला नाही.
खरातने त्याच्या तसेच शेतकऱ्यांच्या नावावर कंपनी स्थापन करून कांदा खरेदी, शासकीय योजनांमधील सहभाग आणि कोट्यवधींची उलाढाल केल्याचा संशय असून तपास यंत्रणांचे लक्ष आता श्री व्यंकटेश कंपनीकडे वळले आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, ही कंपनी ७ डिसेंबर २०२१ रोजी नोंदणीकृत असून, कंपनीचे अधिकृत भागभांडवल सुमारे २५ लाख रुपये असून, कंपनीत अशोक खरात याच्यासह त्याची पत्नी कल्पना खरात व इतर काही शेतकरी संचालक म्हणून काम पाहत होते.
नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी प्रक्रियेतही या कंपनीचा सहभाग आहे का याचा तपास एसआयटी करीत आहे. थेट कांदा खरेदी व्यापाऱ्यांकडून करून, त्यावर शेतकऱ्यांचे सातबारा जोडून केंद्र शासनाची दिशाभूल केल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप आहे.
