नाशिक : केजीएस साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ द्यावे असा न्यायालयीन आदेश असतानादेखील कारखान्याचे संचालक पैसे देत नसल्याने कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
चांदोरीतील कन्यादान मंगल कार्यालय येथे शिंगवे येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर रायते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या थकीत रकमेच्या संदर्भात प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.
केजीएस कारखाना खरेदी-विक्रीच्या वेळी न्यायालयीन प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. न्यायालयात प्रलंबित असलेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा थकीत बिलाचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश कारखाना संचालकांना देण्यात आले होते. बैठकीत संजय गायकवाड, विश्वनाथ दराडे, विलास वाघ, अरुण घुगे, रामदास शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा
कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकरी यांचे सन २०१७-२०१८ या गळीत हंगामातील पेमेंट बाकी आहे. त्यासाठी लढा सुरू आहे. कारखाना प्रशासनाने काही सभासदांचे पेमेंट धनादेशाने केले; परंतु सुमारे १३० शेतकऱ्यांचे अद्यापही सुमारे सव्वा कोटी रुपये बाकी आहेत. प्रशासनाकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बैठकीत न्यायालयीन लढा लढण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर
