अमरावती : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वितरित करण्यात आलेल्या शेती कर्जाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्याचे समोर आले आहे. (Karjmafi)
जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ६५५ शेतकरी सध्या कर्ज थकबाकीदार ठरले असून, बँकेकडून अद्याप कोणतीही ठोस वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Karjmafi)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या जिल्हाभरात एकूण ९४ शाखा कार्यरत आहेत.
या शाखांमार्फत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुरवठा केला जातो. आतापर्यंत १४ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सुमारे ४४३ कोटी २७ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मात्र या कर्जावरील व्याजाची थकबाकीही मोठी असून ती तब्बल २५७ कोटी ५३ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, बँकेकडे २६ हजार ९२७ नियमित कर्जदार खातेदार असून, हे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करत आहेत.
विशेष म्हणजे, थकबाकीदारांवर कारवाई नसतानाही अनेक प्रामाणिक कर्जदार स्वतःहून आपली थकबाकी भरत असल्याचे चित्र दिसत आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण यादी बँकेने आपल्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून ३० जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आल्याने वसुलीबाबतची प्रक्रिया सध्या ठप्प असल्याचे समजते.
कर्जमाफीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत धोरण किंवा आदेश जाहीर झालेले नसल्याने बँक प्रशासनही प्रतीक्षेच्या भूमिकेत आहे.
दरम्यान, वाढती थकबाकी आणि थांबलेली वसुली मोहीम यामुळे बँकेसमोरील आर्थिक आव्हाने अधिकच गंभीर होत असून, आगामी काळात यावर कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!
