अमरावती : कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडल्याने जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. कर्जाचा भरणा करावा की कर्जमाफीची प्रतीक्षा करावी, या द्विधा मनःस्थितीत शेतकरी अडकले असून आर्थिक ताण वाढत आहे.(Karjamafi)
सध्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल ७३ हजार ४१३ खातेदार थकबाकीदार असून त्यांच्याकडे ७९८.३१ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे.(Karjamafi)
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांचे मिळून सुमारे दीड लाख शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. (Karjamafi)
३० जून २०२५ पर्यंत जिल्हा बँकेचे ७२ हजारांहून अधिक आणि राष्ट्रीयीकृत, खासगी तसेच ग्रामीण बँकांचे सुमारे ८५ हजार शेतकरी थकीत आहेत. या सर्वांची माहिती संबंधित बँकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.(Karjamafi)
कर्जमाफीची घोषणा; अंमलबजावणीची प्रतीक्षा
राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया मंदावल्याने शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
नियमित खातेदारांनाही प्रतीक्षा
कर्जमाफीसोबतच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.
अमरावती जिल्हा बँकेच्या सुमारे ४८,८६९ नियमित खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. तरीही या शेतकऱ्यांनाही अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात १६०० कोटींची थकबाकी
जिल्ह्यातील सर्व बँकांचे मिळून पीक कर्ज थकीत रक्कम सुमारे १,६०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मिळून ३.५४ लाख शेतकरी खातेदार थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकूण ३६९१.१२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
‘आधार’ संलग्नतेत प्रगती
जिल्हा बँकेने बहुतांश खात्यांचे ‘आधार’ संलग्नीकरण पूर्ण केले असून, ७२ हजारांहून अधिक खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ही प्रक्रिया जवळपास ९९ टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
शेतकरी संभ्रमात; व्याजमाफीचा प्रश्न
३१ मार्च जवळ आल्याने कर्ज फेडावे की थांबावे, या प्रश्नाने शेतकरी संभ्रमात आहेत. कर्ज न फेडल्यास व्याजमाफीपासून वंचित राहण्याची भीती आहे, तर कर्ज फेडल्यास कर्जमाफीचा लाभ मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
कर्जमाफीची घोषणा असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. शासनाने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अधिक वाचा : Tur Harbhara Kharedi : वाशिममध्ये तूर-हरभरा खरेदीचा धडाका; हजारो क्विंटल माल खरेदी
