अमरावती : यंदाचा खरीप हंगाम अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असून कृषी विभागाने नियोजनाची गती वाढवली आहे. (Kapas Cultivation)
जिल्ह्यात यावर्षी सुमारे ६.७८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Kapas Cultivation)
या हंगामासाठी ८६,६०६ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून कपाशीचे क्षेत्र तब्बल २.५० लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दशकात पहिल्यांदाच कपाशीचे क्षेत्र उच्चांकी पातळीवर जाणार असल्याचे चित्र आहे.
कपाशीला शेतकऱ्यांची पसंती
यंदा शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा पारंपरिक पिकांकडे, विशेषतः कपाशी कडे वाढताना दिसत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असताना कपाशीचे पीक तुलनेने सावरले.
त्यात सध्या कपाशीला ८,५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास या पिकावर वाढला आहे.
त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र सुमारे २.४९ लाख हेक्टर राहण्याचा अंदाज असला, तरी कपाशीचा वरचष्मा स्पष्ट दिसत आहे.
पावसाच्या अंदाजाचा परिणाम
हवामान संस्थांच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनची सुरुवात चांगली होण्याची शक्यता आहे. जून-जुलैमध्ये सरासरी पाऊस अपेक्षित असला, तरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसात तुटवडा राहू शकतो.
या पार्श्वभूमीवर कमी जोखमीची आणि स्थिर उत्पन्न देणारी पिके निवडण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
कपाशी बियाण्यांची मोठी मागणी
यंदा कपाशी लागवडीसाठी सुमारे १२.४७ लाख बियाणे पाकिटांची आवश्यकता भासणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातून : ३१,५७८ पाकिटे
खासगी क्षेत्रातून : १२,१५,७८९ पाकिटे
महाबीजमार्फतही बियाण्यांचा पुरवठा होणार असून क्षेत्रवाढ लक्षात घेता बियाण्यांचा तुटवडा होऊ नये, यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
पिकनिहाय बियाण्यांची गरज
कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या खरीपासाठी पुढीलप्रमाणे बियाण्यांची मागणी आहे:
मका : ७,०७२ क्विंटल
तूर : ५,७६० क्विंटल
सोयाबीन : ६५,३५१ क्विंटल
ज्वारी : ४५० क्विंटल
उडीद, मूग, भुईमूग यांचीही लक्षणीय मागणी
खतांचे १.५४ लाख मे.टन आवंटन
खरीप हंगामासाठी यंदा १.५४ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.
युरिया : ३८,४०० मे.टन
डीएपी : २४,९०० मे.टन
एसएसपी : ३७,८०० मे.टन
संयुक्त खते : २९,८६६ मे.टन
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवंटन संतुलित ठेवण्यात आले असून वेळेवर पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे.
प्रशासनाची तयारी सुरू
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपसंचालक वरुण देशमुख यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी खरीप नियोजन, बियाणे व खत उपलब्धता, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन या कामात व्यस्त आहेत.
कपाशीला चांगला दर, हवामानाचा अंदाज आणि मागील हंगामातील अनुभव या तिन्ही घटकांमुळे यंदा अमरावती जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र विक्रमी होण्याची शक्यता आहे.
मात्र, बियाणे आणि खतांचा सुरळीत पुरवठा तसेच पावसाची अनिश्चितता ही आव्हाने कायम असल्याने योग्य नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
